रिसोड ते मादणी हा रस्ता रिसोड ते मेहकर या गावांना जोडणारा व अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषदेकडे होता. त्यामुळे या रस्त्यासाठी तुटपुंजा निधी प्राप्त व्हायचा; परंतु करडा ग्रामपंचायत सरपंचांनी वारंवार पाठपुरावा करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करून घेतला. आता या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनेच काय, तर पायी चालतानाही त्रास होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत होते. त्यामुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन चालक या मार्गावर वाहने चालवितात. वाईट अवस्थेमुळेच या रस्त्यावरून मेहकर, रिसोड आगाराची बससेवा बंद झाली आहे. त्यामुळेच करडा, गोभणी, वडजी येथील सरपंचांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीबाबतचे ठराव पारित करून गुरुवारी ग्रामस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली आणि उपविभागीय अभियंता डी. एस. खारोळे यांना निवेदन देऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी केली. यावेळी प्रा. वसंतराव देशमुख करडा, अशोकराव देशमुख उपसरपंच गोभणी, संदीप धांडे पं. स. सदस्य रिसोड, प्रभाकर देशमुख सेवानिवृत्त तलाठी करडा यांच्यासह करडा, गोभणी, वडजी, धोडप येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००००००००००
कोट: रिसोड ते मादणीदरम्यानच्या रस्त्याची अवस्था वाईट असल्याची जाणीव आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असून, येत्या एक ते दीड महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल.
-डी. सी. खारोळे,
उपविभागीय अभियंता, सा. बां. उपविभाग
००००००००००००००००००००
कोट: परिसरातील गावाकरिता हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. या रस्त्यावरील रिसोड, मेहकर ही बससेवाही बंद झाल्याने शेकडो ग्रामस्थांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी आमची मागणी आहे.
देशमुख,
सरपंच,
ग्रामपंचायत करडा