संतोष वानखडे
वाशिम : पर्यावरणबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘इको क्लब’ शाळांनाच यंदा प्रत्येकी २५०० रुपये अनुदान मिळणार आहे. राज्यातील ८८०७ पैकी २४०० शाळांची निवड झाली असून, यासाठी ६० लाखांची गरज असताना २४ ऑगस्ट रोजी केवळ १० लाखांचाच निधी मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या समस्येबाबत तसेच सद्य:स्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संरक्षणाच्या व संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामांमध्ये सहभागी करून जनजागृती करण्याच्या उद्देशातून राज्यात २०१६- १७ पासून राष्ट्रीय हरित सेना हा उपक्रम ८८०७ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. विद्यार्थी हरित सेना या योजनेंतर्गत इको क्लब असलेल्या शाळांना शासनाकडून २५०० रुपये अनुदान देण्यात येते. दरम्यान यावर्षीपासून ही योजना चांगल्याप्रकारे राबविणाऱ्या इको क्लब शाळांनाच अनुदान मिळणार असून, यासाठी २४०० शाळांची निवड करण्यात आली. या शाळांना प्रत्येकी २५०० रुपयांप्रमाणे ६० लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात २४ ऑगस्ट रोजी १० लाखांच्या निधी वितरणाला शासनाकडून मंजुरी मिळाली. उर्वरित निधी केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे.