वाशिम : ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करुन ओबीसींच्या आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आणि घटनाबाहय असलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा काढल्याशिवाय समस्त ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणातील आरक्षण मिळणे अशक्य असल्याचे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक प्रा. डी. आर. ओहोळ यांनी केले.
स्थानिक स्वागत लॉन येथे ५ सप्टेंबरला ओबीसींच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्यावतीने ओबीसींमध्ये जाणीव जागृती व प्रबोधन अभियानांतर्गत आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन आमदार ॲड. किरणराव सरनाईक ह्यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या हक्कांसाठी ओबीसींनी संघटनात्मक संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ. रवी जाधव, माजी जि. प. सदस्य राजूभाऊ चौधरी, ओबीसी प्रवर्गाचे अभ्यासक विकास गवळी, ओबीसी मोर्चाचे राज्य प्रभारी विनोद इंगळे, तुकाराम वाशीमकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे, अ. भा. सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे राज्य उपाध्यक्ष गोविंद रंगभाळ, माळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नागेश काळे, बाजार समितीचे संचालक अनिल गोटे मानदार, सामाजिक कार्यकर्ते अनिल गवळी, सामाजिक कार्यकर्ते गजानन भोयर, भावसार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जवादे, माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा किरणताई गिर्हे, जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, विश्वकर्मा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश गव्हाणकर , सय्यद रहेबर, लोणारी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत खांडेकर, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चिल्लोरे, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव सुरेकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक चुंबळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डी. आर. ओहोळ यांनी ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात देशभरात ओबीसीमध्ये जाणीव, जागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. देशात ओबीसींच्या ३७४३ जाती तर महाराष्ट्रात ३३२ आणि वाशीम जिल्ह्यात ५७ जाती आढळतात. ह्यापैकी कुणबी, माळी, तेलीसह या प्रवर्गातील १७ जातींपर्यंत जिल्ह्यातील कार्यकर्ते पोहोचल्याने या मंडळीचा प्रामुख्याने प्रशिक्षण शिबिरात सहभाग असल्याचे ते म्हणाले. या प्रशिक्षणात सद्य:स्थितीत कळीचा मुद्दा बनलेला ओबीसी आरक्षण हा विषय चर्चेत राहिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवी जाधव यांनी तर संचालन गजानन धामणे यांनी केले. उपस्थितांचे आभार ओबीसी मोर्चाचे मुख्य संयोजक इंजि. सीताराम वाशिमकर यांनी केले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००००
ओबीसींच्या जनगणनेला बगल देण्याचे कारस्थान
स्वातंत्र्योत्तर काळात बहुविध सत्ताधारींनी ओबीसींची जनगणनेच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी नानाविध बाबी समोर आणून ओबीसींच्या जनगणनेला मुद्दाम बगल देण्याचे कटकारस्थान कसे रचले याची पोलखोल प्रा. डी. आर. ओहोळ यांनी केली. ओबीसींनो आपली जातवार जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना लोकसंख्यांच्या प्रमाणात आरक्षण कसे मिळणार? जर या प्रमाणात आरक्षणच नाही तर तेवढा ओबीसी आरक्षित कोटा कसा येणार आणि जर कोटाच नाही तर राखीव जागा आणि विकास निधी कसा मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित करून ओबीसींच्या डोळ्यांवरची झापड उडविली.