पुरेशा प्रमाणात सकस आहार न मिळणे, विविध कारणांनी प्रकृती खराब असणे आदींमुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी लहान बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आढळून येत आहे; तर शहरी भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाचा आजार समोर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना महामारीचा सर्वसामान्यांसह मुलांनाही मोठा फटका बसला असून शाळा बंद असल्याने मुलांना ‘ऑनलाइन’ शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मुले टीव्ही आणि मोबाइलमध्येच अधिक काळ व्यस्त राहत आहेत. मैदानी खेळही बंद असल्याने लठ्ठपणाचा आजार मुलांना जडत आहे.
............
शहरांत स्थूलता ही नवी समस्या
कोरोनाचा प्रकोप होण्यापूर्वी मुलांची दैनंदिनी ठरलेली असायची. सकाळपासून सायंकाळपर्यंत शाळेत राहावे लागायचे. अनेक मुले विविध क्रीडा प्रकाराच्या विशेष सरावासाठी मैदानावर जात होती. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहत असे; मात्र कोरोनामुळे मुले घरात कोंडली गेली. त्यातूनच शहरी भागात लहान मुलांमध्ये स्थूलतेची नवी समस्या भेडसावत आहे.
...........
कारणे काय?
अनेक मुले गोड पदार्थांच्या सेवनासह जंकफूड खाण्यावर अधिक भर देतात. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे.
घरीच राहावे लागत असल्याने मुलांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही आणि मोबाइलमध्येच जात आहे. मैदानी खेळ पूर्णत: बंद पडले आहेत.
अनेक मुले दैनंदिन जेवणामध्ये विविध पालेभाज्या खाण्यास नकार देतात. त्यात तुपासह, तेलकट पदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे.
....................
तज्ज्ञ काय म्हणतात?
मुलांमध्ये स्थूलतेची समस्या प्रत्येकच घरात भेडसावत आहे. कोरोनामुळे मुले घरामध्ये अडकून आहेत. त्यातच विविध प्रकारचे तळीव पदार्थ खाण्यावर अनेकांचा भर आहे. स्थूलता टाळायची असेल तर पालकांनी मुलांना तूप, तेलकट पदार्थ खायला देऊच नये. दररोज काही वेळ मैदानावर खेळायला पाठवावे.
- डॉ. हरीश बाहेती
...........
मॅगी, पिझ्झा, बर्गर यासह इतर प्रकारचे पदार्थ सेवनामुळे मुलांना भूक लागण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे विशेषत: जंकफूड प्राधान्याने टाळायला हवे. त्याऐवजी हिरव्या पालेभाज्यांसह सकस आहार द्यावा. मूल सहा वर्षापेक्षा अधिक वयाचे झाल्यानंतर दुधाचे प्रमाण कमी करावे. पालकांनी मुलांना टीव्हीसमोर बसू देण्याऐवजी दिवसातून काही काळ मैदानावर खेळू द्यावे.
- डॉ. दीपक ढोके
...............
पालकांचीही चिंता वाढली
गेले अनेक महिने कोरोनाचे संकट कायम राहिले. त्या भीतीपायी मुलांना बाहेर खेळायला पाठविणे धोकादायक वाटायचे. मुले घरचे पदार्थ खाऊन कंटाळल्याने बाहेरचे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. यामुळे मुले लठ्ठ होत असल्याची समस्या भेडसावू लागली आहे.
- पवन राजगुरू
...................
कोरोनाच्य संकटामुळे शाळा अद्याप बंद आहेत. कोरोनापूर्वी मुले शाळेत जात होती. मैदानावर खेळत होती; परंतु हे सर्व बंद झाले असून, मुले मोबाइल-टीव्ही पुढे अडकली आहेत. त्यामुळे मुलांच्या वजन वाढीच्या तक्रारी आहेत.
- अमोल काळे