कारंजा लाड (जि. वाशिम): माझे घर या कविकुमार यांच्या कवितेतील या ओळी घराला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत. या चार ओळी मानवाने जीवनात आत्मसात केल्या तर जीवन समृद्धमय आणि शांततामय होईल यात कुठेही दुमत नाही; पण जात आणि धर्माच्या बेडीत अडकलेल्या काही समाजकंटकांनी कारंजा शहराची शांतता भंग केली; परंतु शहरवासीयांनी धैर्य व संयमाची मोट बांधून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने व शहरातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या उपस्थित २३ रोजी संपूर्ण शहरातून सर्वधर्मीय सद्भावना रॅली काढून शहरवासीयांना शांततेचा संदेश देण्यात आला. सद्भावना रॅलीस सुरुवात करण्यापूर्वी पोलीस स्टेशन आवारात सभा घेण्यात आली. रॅलीद्वारे शांततेचे आवाहन करून एकता कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नीशाताई गोलेच्छा, उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव देशमुख, तहसीलदार गिरासे यांची उपस्थिती होती. त्याशिवाय सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, श्री गुरुदेव सेवाश्रम रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, नगर परिषद शिक्षक, डॉक्टर मंडळी, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसह पोलीस अधिकारी, कर्मचारी रॅलीत सहभागी होते. ही रॅली शहरातील रामासावजी चौक, जिजामाता चौक, भारतीपुरा, शिवाजी नगर, जयस्तंभ चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक या ठिकाणाहून फिरविण्यात आली. या रॅलीत सर्व धर्माचे नागरिक उपस्थित होते. रॅलीदरम्यान पोहा वेशीजवळ सुभाषचंद्र बोस चौक येथे युवक मंडळाच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
‘जिव्हाळा हा घराचा कळस, माणुसकी ही घराची तिजोरी’!
By admin | Updated: July 24, 2015 01:19 IST