बसेसअभावी प्रवाशांना त्रास
वाशिम : मंगरुळपीर आगारात ग्रामीण भागांतील बसफेऱ्या, तसेच मुक्कामी जाणाऱ्या बसेस अद्यापही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागांतील प्रवाशांना अडचणी येत आहेत. नियमित सर्व बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून केली जात आहे.
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
वाशिम : खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत, परंतु आता वन्य प्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात रोहींचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडदाची पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
...तर अधंश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधा
वाशिम : जादूटोणाविरोधी कायद्यानुसार जिल्ह्यात अशासकीय समितीची स्थापना करण्यात आली असून, जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कोणत्याही नागरिकाची फसवणूक किंवा दिशाभूल झाल्यास पीडित व्यक्तींनी अशासकीय समिती सदस्यांशी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस. खंदारे यांनी केले.
अनसिंग येथे ई-पीक प्रशिक्षण
वाशिम : वाशिम तालुका दंड अधिकारी विजय साळवे यांनी अनसिंग ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत प्रशिक्षण देतानाच, प्रत्यक्ष शेतात जाऊन ई-पीक पाहणी केली. ई-पीक पाहणी ॲप हे ई-पीक माहिती व इतर बऱ्याच प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे असल्याचे यावेळी सांगितले.
पावसामुळे जलस्रोतात वाढ
वाशिम : पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले आहेत. त्यात जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या ८८ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. पावसामुळे जलस्रोतात माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य असले, तरी कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेचे सावट कायमच असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाकडून करण्यात येत आहे.