जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून त्यांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. त्यात तपोवन येथील परिपक्वतेच्या अवस्थेत असलेले उसाचे पीकही जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तथापि, या नुकसानीची पाहणी व पंचनामे स्थानिक प्रशासनाने केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पंकज लक्ष्मणराव येवले, रवींद्र कोंडुजी सावध, मुरलीधर महादेव येवले, शरद भानुदास येवले, स्वप्नील दिलीप येवले, गणेश सोपानराव येवले, गजानन लक्ष्मण येवले या सात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
००००००००००००००००००
उत्पादनाची आशाच नाही
सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकाला तडाखा बसून, संपूर्ण पीक मोडून जमिनीवर पडले. आता हे पीक उभे होण्याची कुठलीच शाश्वती नसल्याने या पिकापासून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना राहिली नाही.
००००००००००००००००००
पाच दिवस उलटूनही दखल नाही
तपोवन येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. यात ऊस पिकाचाही समावेश आहे. तथापि, पाच दिवस उलटून गेले तरी या पिकाचे पंचनामे करण्याची तसदी महसूल किंवा कृषी विभागाने घेतली नाही.
००००००००००००००००००
कोट : सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे आमच्या शेतातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण पीक मोडून पडले आहे. त्यामुळे यातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.
-शरद येवले,
ऊस उत्पादक शेतकरी,
००००००००००००००००००
कोट : मुसळधार पावसामुळे दीड एकर क्षेत्रातील उसाचे पीक पूर्णपणे कोलमडून पडले. आता या पिकातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नाही. त्यामुळे या पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यातच गेला असून, आर्थिक संकट आमच्या कोसळले. तेव्हा आम्हाला आर्थिक मदत मिळावी.
--रवींद्र सावध,
ऊस उत्पादक शेतकरी