संतोष वानखडे
वाशिम : कोरोनातून बरे झालेल्यांना अन्य आजारही जडत असल्याचे समोर येत आहे. सलग २० दिवसांपेक्षा अधिक काळ सर्दी, खोकला असेल तर अस्थमा (दमा) आजार जडण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशा रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन स्वत: सुरक्षित ठेवावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
कोरोनातून बरे झालेल्यांना वातावरणातील बदलामुळे अन्य आजारही जडत असल्याचे समोर येत आहे. कोरोनामुळे फुप्फुस कमजोर झाल्याने आणि ॲलर्जी असल्याने पोस्ट कोविडच्या काही जणांना अस्थमा आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून येत आहेत. अस्थमा हा फुप्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषत: श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांना धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक ॲलर्जीकारक घटक असतात. यामुळे वारंवार सर्दी व खोकलादेखील येतो. गत एका महिन्यापासून वातावरणात बदल होत असल्याने पोस्ट कोविडच्या काही रुग्णांना १५ ते २० पेक्षाही अधिक दिवस सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवत आहेत. यावर वेळीच निदान केले नाही किंवा दुखणे अंगावर काढले तर अस्थमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेळीच निदान व उपचार मिळाले तर हा आजार पूर्णत: बरा होणारा असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
.......
पोस्ट कोविडच्या रुग्णांना काय लक्षणे जाणवत आहेत?
वातावरणातील बदलामुळे दीर्घकाळ सर्दी, खोकला.
धुळीच्या ॲलर्जीमुळे वारंवार सर्दी येणे.
वारंवार शिंका येणे.
पायऱ्या चढताना दम लागणे.
श्वास घेताना त्रास जाणवणे.
००००००००००००००००
दक्षता काय घ्यावी?
थंड पाणी, थंड पदार्थांचे सेवन टाळावे.
ॲलर्जी असलेल्या वस्तू, पदार्थांपासून दूर राहावे.
पावसात भिजणे टाळावे.
कान, नाकाला थंड हवा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने औषधोपचार सुरू करणे.
००००००००००००००
कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ४१०४३
अस्थमाची प्राथमिक लक्षणे आढळून येणारे ८०
००००००
डॉक्टर म्हणतात वेळीच निदान व्हावे
कोट
न्यूमोनिया, कोरोनातून बरे झालेल्या काही जणांमध्ये अस्थमाची प्राथमिक लक्षणे आढळून येत आहेत. वेळीच निदान व उपचार मिळाले तर या आजारातून रुग्ण पूर्णत: बरा होऊ शकतो. त्यामुळे कोणताही आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सिद्धार्थ देवळे,
एमडी, मेडिसीन, वाशिम.
.......
पोस्ट कोविडच्या काही जणांना दीर्घकाळ सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ॲलर्जीमुळे सर्दीचा त्रास वाढतो. अशा रुग्णांनी धुळीपासून दूर राहावे, थंड पाणी, थंड पदार्थांचे सेवन टाळावे. वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.
-डॉ. अमित राठी,
एमडी, मेडिसीन, वाशिम.