मानोरा : येथील आदिवासी कार्यालयात १० सप्टेंबर रोजी आयोजित चर्चासत्रात आदिवासींच्या विविध स्वरूपातील प्रश्नांबाबत ऊहापोह झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजबांधवांचे उद्बोधन केले.
प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य चिंतामण खुळे होते. माजी नियोजन अधिकारी डॉ. महादेवराव डाखोरे, नाजूकराव भोंडणे, सुभाषराव करवते, अशोकराव आगलावे, विजय भुरकाडे, बळवंत साखरकर, चंदू भुजाडे, मारोती पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासी समाजावर अद्यापही सुरू असलेले अन्याय, अत्याचार, आदिवासी योजनेतील लाखोंचा घोटाळा, आदिवासी समाजाचे आमदार, खासदार समाजाहितासाठी काय करीत आहे?, जमीन हस्तांतरण, आदिवासी प्रकल्प कार्यालयातील दरवर्षी योजनेचा निधी आदिवासींना पुरेपूर वाटप न करता शासनाकडे परत केला जातो किंवा इतरत्र निधी वळविल्या जातो, आदी विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच यापुढे समाजबांधवांनी काय करायला हवे, याची दिशाही ठरविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू वाघमारे यांनी केले. सुभाष मोरकर यांनी संचालन केले. गजानन डोलारकर यांनी आभार मानले.