वाशिम : रब्बी पेरणीच्या नियोजनात खताचा अडथळा राहू नये म्हणून कृषी विभागाने युरिया, डीएपी, एनपीके या खतावर भर दिला असल्याचे दिसून येते. एनपीके १६२९०, युरिया ११५१० मे.टन व डीएपी ८४७० मेट्रीक टन खत मंजूर असून, आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.मूग, उडीद पिकाच्या काढणीनंतर सोयाबीनची सोंगणी व काढणी सुरू आहे. रब्बी हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने ३५ हजार ९०० मे.टन खताची मागणी नोंदविली होती. याऊलट वरिष्ठ स्तरावरून ४३ हजार ९५० मे. टन खत मंजूर झाले. खरिप हंगामात रिसोड तालुक्यासह अन्य काही ठिकाणी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. रब्बी हंगामात युरिया किंवा अन्य खतासंदर्भात गैरसोय होणार नाही म्हणून मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी सांगितले. रासायनिक खत खरेदीसंदर्भात शेतकºयांची फसवणूक किंवा गैरसोय होणार नाही म्हणून कृषी सेवा केंद्रांनी पॉस मशिनच्या माध्यमातूनच खत विक्री करावी, कुणीही आॅफलाईन पद्धतीने खताची विक्री करू नये, असा इशारा बंडगर यांनी दिला.
युरिया, डीएपी खतावर कृषी विभागाचा भर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:53 IST