वाशिम : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात ९ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना होणारे अन्नधान्य वितरण व्यवस्थितपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांना सुद्धा विनाअडथळा धान्य पुरवठा करावा. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य नियतन मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा, असे तिवारी यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.पीककर्ज, अन्नसुरक्षा योजना, शेतकरी आत्महत्या, निराधार योजना अनुदान वाटप, आरोग्य सुविधा, खावटी योजना, कामगारांना अनुदान वाटप, सहकारी मजूर संस्थांचे ऑडिट, गौण खनिज वाहतूक आदी बाबींचा तिवारी यांनी यावेळी आढावा घेतला.
पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवा
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून, जिल्ह्यातील बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. या कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. पुरेसा औषधी साठा ठेवावा. तसेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे.असेही तिवारी म्हणाले.