तलवाडा : विटा तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विटांच्या किमती कडाडणार असल्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सद्य:स्थितीत बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असल्याने या व्यवसायावरदेखील मंदीचे सावट येण्याची शक्यता वीट व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे. जर दर वाढले तर उत्पादकांना फायदा होईल, मात्र मंदी आली तर यामध्ये असलेल्या व्यावसायिकांना गेल्या दोन वर्षांपासून होत असलेला तोटा पुन्हा सहन करावा लागणार आहे़ विटांसाठी मुखत्वेकरून तुस, दगडी कोळसा, माती, भट्टीसाठी जागा, त्याकरिता लागणारा मजूरवर्ग आदींसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा पैसे मोजावे लागत असल्याने त्याचा परिणाम वीट उत्पादनावर होऊन विटांच्या किमतीही वाढणार आहेत़ त्यामुळे वीट उत्पादकांना जादा भावाने वीट विकावी लागणार आहे़ नाहीतर, तोटाच सहन करावा लागेल, असे त्यांनी लोकमतला सांगितले़ तर, सद्य:स्थितीत बांधकामे रखडल्याने विटांची मागणी मंदावलेली आहे़ तसेच तालुक्यात दरवर्षी वीटभट्टीमध्ये नवीन व्यावसायिक येत असल्याने भट्ट्यांचा आकडा हा वाढता असतो व उत्पादनही मोठ्या प्रमाणावर असते़ त्यामुळे सध्या मागणी कमी व उत्पादन जास्त, अशी परिस्थिती आहे़ विक्रमगड व परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो़ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये तरुणवर्गाचे वाढते प्रमाण दिसण्यात येत असल्याने विक्रमगड हे पंचक्रोशीत वीटभट्ट्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध झाले आहे.़ विक्रमगड तालुक्यासह मुंबई व इतर शहरांत इमारतीच्या बांधकामांसाठी बहुतांशी विटा येथील भट्ट्यांमधून नेण्यात येतात़ माती आणि मुबलक पाणी यामुळे येथे हा व्यवसाय वाढला आहे़ त्यातच दगडी कोळसा व तुस, विक्रमगड तालुक्यातच उपलब्ध होऊ लागल्याने वीटभट्टी व्यवसाय या पंचक्रोशीमध्ये भरभराटीस आला आहे. परंतु, या वर्षी वीट तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माती, दगडी कोळसा, गंधक यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच वीट तयार करण्याच्या मेहनतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याने त्याचा फटकाही या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे वीट महागली आहे़
विटांचे दर कडाडणार की पडणार?
By admin | Updated: January 4, 2016 01:20 IST