‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:17 AM2018-03-19T03:17:28+5:302018-03-19T03:17:28+5:30

राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, ताट आणि पिशव्या अशा ठरावीक वस्तूंवर बंदी आणण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली आहे.

'Mission no plastic', 'PET' can be recycled, pet bottle on government radars | ‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही

‘मिशन नो प्लास्टिक’,‘पीईटी’वर पुनर्प्रक्रिया शक्य, सरकारच्या रडारवर पेट बॉटलही

Next

राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या प्लेट, चमचे, ताट आणि पिशव्या अशा ठरावीक वस्तूंवर बंदी आणण्याची घोषणा शुक्रवारी विधानसभेत केली आहे. तुर्तास पेट बॉटल्सवर बंदीची घोषणा झाली नसली, तरी राज्य सरकारच्या रडारवर पेट बॉटलही असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र गेल्या शतकातील सर्वात मोठे संशोधन मानल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी लादल्यास त्याला योग्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का, यावर प्रकाश टाकण्यासाठी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टॅक्नोलॉजीच्या पॉलिमर्स आणि सर्फेस टॅक्नोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. एन. जगताप यांच्याशी ‘लोकमत’ चे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी साधलेला संवाद...
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
- प्लॅस्टिकचा वापर आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात केला जातो. प्लॅस्टिक हे एक पॉलिमर मटेरियल असले, तरी त्याचे विविध प्रकार आहेत. जे विविध साहित्ये वापरून तयार केले जातात. त्यातलाच एक विशिष्ट प्रकार म्हणजेच पॉलिइथिलीन टेरेफ्थॅलेट ज्याला सामान्य भाषेत ‘पीईटी’ असे म्हटले जाते. त्याचा सर्वात जास्त वापर घरगुती कामांसाठी केला जातो. पीईटी हे १०० टक्के रिसायकल करता येते. सध्या पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि प्रदूषणासाठी प्लॅस्टिकला जबाबदार धरण्यात येत आहे. पण वास्तविक बेजबाबदार पद्धतीने फेकला जाणारा कचरा आणि पर्यावरणाकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष हीच त्यामागील कारणे आहेत.
प्लॅस्टिकसाठी काच हा योग्य पर्याय आहे का?
- काचेच्या उत्पादन प्रक्रियेत पाणी आणि वाळू यासारख्या अमूल्य नैसर्गिक संपत्तीचा ºहास होतो. काचेच्या भांड्याच्या पुनर्वापराच्या आधी त्याला निर्जंतुक करणे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यासाठी कोट्यवधी लीटर पाणी खर्च करावे लागेल. दुष्काळाशी चारहात कराव्या लागणाºया महाराष्ट्राला नक्कीच ते व्यवहार्य व नैतिकदृष्ट्या योग्य नाही. काचेची निर्मिती १ हजार ६०० अंश सेल्सिअस तापमानामध्ये केली जाते. इतके उच्च तापमान तयार करण्यासाठी व ते राखून ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज पडते. ज्याचा एकूण भार आपल्या पर्यावरणावर पडतो.
पेट बॉटलवर बंदी घालण्याची गरज वाटते का?
- प्लॅस्टिकमधील पीईटी उत्पादने ही तुलनेने पर्यावरणपूरक आहेत. कारण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी १५० अंश सेल्सिअस ते ३०० अंश सेल्सिअस इतकेच तापमान लागते. सध्या भारतात एकूण उत्पादित पीईटीपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पीईटी हे रिसायकल होते. हा दर जगातील सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळे मूळ समस्या ही प्लास्टिक नसून त्याच्याशी निगडित असलेले आपले वागणे हेच आहे.
प्लॅस्टिकमुळे उद्भवणाºया समस्यांवर उपाय काय?
- पीईटीवर सरसकट बंदी हा या समस्येमागचा तोडगा नसून समाजात स्वच्छतेबद्दल आणि कचºयाचे वर्गीकरण करून प्लॅस्टिकच्या रिसायकलिंगचा जास्तीत जास्त प्रसार करणे हे आहे. सध्याची परिस्थिती बघता, पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि त्याची पुढील हानी रोखण्यासाठी सक्तीचे पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यासाठी महत्त्वाच्या सार्वजनिक जागांवर रिव्हर्स वेन्डिंग मशीन्स लावून रिसायकलिंगला एकूणच प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवायला हवेत. एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की आपली जबाबदारी समजून प्रत्येक संसाधनाचा योग्य वापर करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी. हा एक बदलच या समस्येवर दीर्घकालीन आणि शाश्वत उत्तर ठरेल.

Web Title: 'Mission no plastic', 'PET' can be recycled, pet bottle on government radars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.