पालघर : जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर बॉम्बशोधक, नाशक पथक, श्वानपथकाने तपासणी केली. तपासणीदरम्यान कार्यालयातून सर्वांना बाहेर काढण्यात आले. दोन इमारती रिकाम्या करून कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने कार्यालयातील सर्व विभागांसह बाहेरचा परिसरही पिंजून काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी ६:२३ वाजता कार्यालयात निनावी ई-मेलद्वारे आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची माहिती देत दुपारी ३:३० वाजता त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचा मजकूर ई-मेलमध्ये लिहिला होता.
या मेलची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तेथे बॉम्बशोधक, नाशक पथक, श्वानपथक रवाना केले. यावेळी प्रशासकीय ‘अ’ आणि ‘ब’ या इमारतींमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या इमारतींचा ताबा पाटील यासह अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तेजस चव्हाण आदी उपस्थित होते.
मेलची सत्यता तपासणार हा मेल कुठून आला, याची माहिती सायबर सेलकडून तपासली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. सायबर सेल पथक महाराष्ट्र सायबर सेलच्या संपर्कात असून त्यांची मदत घेतली जात असल्याचे सांगून या सत्यता तपासण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयासमोरील सर्व परिसर तपासल्यानंतर पोलिसांच्या हाती कोणतीही संशयास्पद गोष्ट सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले.