नालासोपारा : विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद अप मार्गावर मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान रेल्वे रूळ वाकल्याचे निदर्शनास आले. मोटरमनने प्रसंगावधान राखून विरार-चर्चगेट एसी ट्रेनचा ब्रेक जागच्या जागी मारल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना घडल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत, फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवत वाकलेला रूळ पूर्णपणे बदलला. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.