वर्धा : सावंगी (मेघे) येथील चैतन्य नगरी येथील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर या परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना या गैरसोयीचा जाब विचारला. तसेच पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन्नाचा इशारा दिला. यावेळी महिलांनी मुख्य अभियंत्याला निवेदन सादर केले. या भागातील नागरिकांना गत पाच-सहा दिवसांपासून केवळ दोन गुंड भरेल इतकेच पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा योग्य होईल या आशेने महिला शेजाऱ्याकडून पाणी आणून गरजा भागवत होत्या. परंतु आठवडा उलटुनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. तसेच प्रत्यक्ष भेट घेवून रजिस्टरमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांनी यालाही केराची टोपली दिली. सलग आठ दिवस नागरिकांनी पाण्याकरिता त्रास सोसला. अखेर महिलांचा संताप अनावर होऊन त्यांनी जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन कार्यालय, वैकुंठ मार्ग येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन समस्या कधी सोडविणार याची विचारणा केली. पाणी पुरवठा अधिकारी बाराहाते यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्राधान्याने पाणीपुरवठा पुरेसा करणे, नळाला लावलेल्या मोटारीवर नियंत्रण आणणे, नळ सोडणाऱ्यांकडून होणारा पक्षपात थांबविणे, पाण्याचे देयक भरण्यासाठी ग्रा.पं. सावंगी कार्यालयात मासिक पाच दिवस उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांवर चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनिषा गणवीर, वनमाला खैरकार, उज्वला नारळवार, उषा वागदे, मिना वासेकर, रजनी सोनपितळे, अर्चना भगत, चंदा थुल, रंजना गोटे, संध्या कांबळे, कर्तव्य सोनपितळे, सतिश नारळवार, अनिल सोनपितळे उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
पाणीपुरवठ्याकरिता महिलांचा एल्गार
By admin | Updated: September 27, 2014 02:06 IST