महिला हिंसाचाराविरोधात शुक्रवारी सामूहिक आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:15+5:30
ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार विरोधी सामूहिक आत्मक्लेश उपवासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीकांत बाराहाते यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराला समृद्ध व चिंतनशील वारसा लाभला आहे. या जिल्ह्यातून काही मूल्यांचे संवर्धन राष्ट्रीय पातळीवर झाले आहे. ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार विरोधी सामूहिक आत्मक्लेश उपवासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीकांत बाराहाते यांनी पत्रपरिषदेत दिली.
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत हा सामूहिक आत्मक्लेश उपवास होणार आहे. हिंगणघाट येथील घटनेने संवेदनशील नागरिकांच्या हृदयाला वेदना झाल्या आहेत. समाज म्हणून या घटनेच्या व यासारख्या राज्यातील, देशातील इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुष समानता, लिंगभेदी हिंसा, स्त्री स्वातंत्र्य, प्रबोधन या सर्व प्रश्नांवर सामुहिक चिंतन करून हिंगणघाट, औरंगाबाद, मुंबई यासारख्या अनेक भिषण मानवता विरोधी घटनांच्या विरोधात सामूहिक उपवास, आत्मक्लेश करण्याकरिता समाजातील सर्व पक्षीय, सर्व सामाजिक, सांस्कृतिक, परिवर्तनवादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदारही यात सहभागी होऊन बारा तास उपवास करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा चिंतनीय उपवास असून याचा उत्सव किंवा समारंभ होऊ नये याची काळजी प्रत्येकानी घेण्याची गरज आहे. या पत्रपरिषदेला किसान अधिकारी अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर व शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ व शारदा झामरे यांची उपस्थिती होती.