कारंजा (घा़) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन नापिकीची नुकसान भरपाई मिळाली नाही़ या प्रकरणात जबाबदार कोण, तहसील कार्यालय की बँक प्रशासन, असा सवाल वंचित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़यंदा नापिकीचे पैसे वाटपाचे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लवकर झाले असले तरी बँकेत ती रक्कम जमा करताना खाते क्रमांकातील चुकांमुळे ते परत गेले़ स्टेट बँकेने प्रथम शेतकऱ्यांचे नाव व सोबत इतर शब्द लावून पाठविलेले अंदाजे तीन लाख रुपये तहसील कार्यालयाकडे परत गेले़ इतर बँकांनी मात्र अशा खातेदारांचे पैसे जमा केले़ स्टेट बँकेचे खाते क्रमांक अकरा आकडी तर बँक आॅफ इंडियाचे १५ आकडी आहेत. या १५ आकड्यांत शेवटचे ३ व ४ आकडे महत्त्वाचे आहे; पण त्यापूर्वी एक शून्य नसल्यास पैसे परत पाठविले जातात. धरती सोनेगाव येथील नत्थू नारायण डोंगरे या शेतकऱ्याचे १० हजार ५०० रुपये ठाणेगाव येथील बँक आॅफ इंडियाने खाते क्रमांक चुकीचा असल्याने परत पाठविले. यानंतर तलाठ्याने सुधारित खाते क्रमांक दिला. येथील बँक आॅफ इंडियाला तहसील कार्यालयाने ३० एप्रिल रोजी पाठविलेल्या धनादेशात शेतकऱ्याची रक्कम आहे; पण बारा दिवस होऊनही ती खात्यात जमा झाली नाही. बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता, बँकेला तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांची यादी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले़ तहसील कार्यालय मात्र यादीची गरज नसल्याचे सांगत आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)
नापिकीचे पैसे न मिळाल्यास जबाबदार कोण?
By admin | Updated: May 15, 2015 02:00 IST