चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. अभयारण्यात वाघांसह, बिबट, अस्वल, सांबरसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. या जंगलात भारतीय बायसन (रानगवा) आणण्यासाठी वनविभागाकडून हालचालींना वेग देण्यात आला होता. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, गत तीन वर्षापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.
वनविभागाने जिल्ह्याच्या बोर जंगलात बायसन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. २०२२ मध्ये यासंदर्भात पेंचला पत्र पाठविले होते. पेंचमध्ये गव्यांची संख्या स्थिर असल्याने बोर जंगलात सांबरच्या बदल्यात गवा आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे ही देवाण-घेवाण रखडली आहे.
पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमींच्या मते, बोर जंगलात गव्यांची कायमस्वरूपी उपस्थिती राहिल्यास वाघ व इतर भक्षक प्राण्यांसाठी संतुलित अन्नसाखळी निर्माण होऊ शकते. यामुळे जैवविविधतेस चालना मिळेल आणि परिसंस्थेला अधिक स्थैर्य लाभेल. भारताच्या सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला बोर प्रकल्प, पेंच, ताडोबा आणि मेळघाट या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांशी धोरणात्मकदृष्ट्या जोडलेला आहे. अशा परिस्थितीत, बायसनच्या आगमनामुळे हा परिसर अधिक समृद्ध होऊ शकतो. आता वनविभाग या दिशेने ठोस पावले कधी उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तीन वर्षापूर्वी दिला होता प्रस्तावबोर अभयारण्यातून पेंच अभयारण्यात सांबर पाठवून त्या बदल्यात बायसन आणण्यासाठीचा प्रस्ताव २०२२ मध्ये पाठविण्यात आला. त्याचा उद्देश दोन्ही अभयारण्यांच्या पर्यावरणीय गरजा संतुलित करणे आणि वन्यजीव जैवविविधता समृद्ध करणे असा होता. मात्र, तीन वर्षे उलटूनही, पेंच व्याघ्र प्रकल्पातून बायसनचे हस्तांतरण अद्याप झाले नाही. बायसन नेमके देणार कुठून, हे स्पष्ट नव्हते. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली