घोराड : उन्हाळ्याचे दिवस सुरू असून आतापर्यंत सुरळीत सुरू असलेला वीज पुरवठा भारनियमनच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे महाबळा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचे चटके सोसावे लागत असून पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. २ हजार ५00 लोकसंख्या असलेल्या महाबळा येथे गत काही दिवसांपासून १२ ते १५ तास भारनियमन केले जात आहे. यात सकाळी ५ ते १.३0 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असतो तर पुन्हा रात्री ६ ते १0.३0 वाजेपर्यंंत वीज गायब असते. या दोन वेळात वीज भारनियमन केले जात असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. शिवाय अधून-मधून एक ते दीड तासाचे ब्रेकडाऊन होत असल्याने भर उन्हातही कुलरच्या थंड हवेपासून नागरिकांना मुकावे लागत आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी घरोघरी पंखे व कुलर लागले आहे; पण महाबळा येथे ही विजेवरील उपकरणे शोभेचे ठरत आहे. या तळपत्या उन्हात चिमुकल्यांच्या रडण्यापुढे घरातील मंडळी हतबल झाल्याचे चित्र आहे. विजेचे बिल भरूनही वीज मिळत नाही, अशी व्यथा महाबळा वासियांची आहे. हे भारनियमन असेच सुरू राहिले तर आंदोलन करण्याची मानसिकता ग्रामस्थ बोलून दाखवित आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला असता कंपनीने ठरवून दिलेल्या निकषानुसार महाबळा गावाला व कृषी क्षेत्राला एकाच फिडरवरून वीज पुरवठा केला जात आहे. गावातील घरगुती वीज देयके सुरळीत भरली जात असून कृषी पंपाचे वीज देयक थकित आहे. यामुळे हे गाव डी ग्रुपमध्ये आले आहे. यामुळे या गावाला भारनियमन लागू झाले आहे. या नियमांमुळे ग्रामस्थांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. गावाला नियमित वीज पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.(वार्ताहर)
परिसराला भारनियमनाचा फटका
By admin | Updated: May 25, 2014 23:48 IST