पराग मगर - वर्धा घरी बापजाद्याची इस्टेट कधी नव्हतीच. लहानपणापासूनच कष्ट करण्याची सवयच पडली. लग्नानंतरही फारसं काही बदललं नाही. संघर्ष सावलीसारखा सोबतच होता. बसस्थानकावर रस्त्याच्या कडेला फळं विकायला सुरुवात केली. आता हे काम अंगवळणी पडलं आहे; पण गावाकडचे गरीबच आमचे गिऱ्हाईक.या गरिबांच्या जीवावरच आम्ही आमची गरीबी पोसतो, अशा हळव्या भावना येथील कष्टकरी फळविक्रेत्या महिला व्यक्त करतात. बसस्थानकावर गर्दीत रस्त्याच्या कडेला केळी, पपई, बोरं, जांभ, संत्री अशी फळं विकायला बसलेल्या लक्ष्मी जंगले, शोभा रंगारी, माया थूल आणि सोबतच इतरही अनेक कष्टकरी महिला नजरेस पडतात. १५ ते २० वर्षांपासून त्या फळविक्री करीत आहेत. सकाळी मंडीवर जाऊन टोपल्याप्रमाणे फळं विकत घ्यायची आणि किरकोळ भावाने सायंकाळपर्यंत विकायची हा त्यांचा दिनक्रम. बंड्यांवरील दुकानांपेक्षा या महिलांजवळ फळे थोडे स्वस्त मिळतात. त्यामुळे बसस्थानकावर गावाकडून आलेले नागरिक या महिलांचे हक्काचे गिऱ्हाईक. बसस्थानकावर जवळपास १५ ते २० महिला दररोज फळविक्रीसाठी बसलेल्या असतात. रस्त्याच्या कडेला धावणारी वाहने, ये जा करीत असलेल्या बसेस, कोलाहल, नागरिकांची गर्दी अशा वातावरणात फळे विक्री करण्याची कला या महिलांनी साधली असली तरी त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आजूबाजूला सतत आॅटो, रिक्षा येऊन थांबत असतात. त्यांच्याशी भांडू भांडू रस्ता मोकळा करावा लागतो. कधी कधी खूप गर्दी होऊन जाते. अशावेळी वाहतूक पोलीस उठवितात. मग जागेसाठी भांडणे होतात. याही परिस्थितीत जिद्दीने या महिला व्यवसाय करीत असतात. कशीबशी शंभर दोनशे रुपयांची कमाई होते. एकमेकींशीच स्पर्धा असली तरी हिम्मतही एकीची दुसऱ्याला. त्यामुळे सुख-दु:खही सारखीच. रस्त्यावर काम करीत असलेल्या महिलांसाठीही काही योजना शासनाने राबवाव्या अशी अपेक्षा महिला व्यक्त करतात.शेवटपर्यंत आमच जीवन उपेक्षितच राहणार का असा जळजळीत प्रश्नही त्या व्यक्त करतात.
गरिबांच्याच जीवावर आम्ही पोसतो गरिबी
By admin | Updated: January 10, 2015 23:00 IST