वायगाव(नि.) येथे जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र अनेकदा ग्राहकांना अतिरीक्त देयक दिले जात असल्याने याबाबत असंतोष व्यक्त केला जात आहे. यासंर्भात संबंधितांकडे तक्रार करूनही कार्यवाही केली नसल्याने ग्राहकांवर अतिरीक्त देयकाचा बोजा पडत आहे.वायगाव येथील वॉर्ड क्रमांक २ येथील रहिवासी बापुराव वरवटकर यांच्यावर असाच अतिरीक्त देयकाचा बोजा पडला आहे. येथील अनेक नागरिकांना अत्यल्प पाणीपुरवठा होतो. घरातील नळाला पाणी येत नसल्याने नळ कनेक्शन बंद करण्यासाठी वारंवार अर्ज केला. मात्र नळ अद्याप कनेक्शन बंद करण्यात आले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने नळयोजना प्राधीकरणला हस्तांतरित केली आहे. नळाद्वारे पाणी येत नसतानाही त्यांना अकरा ते बारा हजार रूपये देयक आकारण्यात आले. यामुळे वरवटकर यांनी उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा यांच्याकडे तक्रार दिली. नळाला पुरेसे पाणी येत पंप नसल्याने गावातील नागरिकांनी पंप लावले आहे. मात्र ज्या ग्राहकांकडे पंप नाही त्यांना पाणीच मिळत नाही. वरवटकर यांच्या घरच्या नळाद्वारे पाणी येत नसतानाही त्यांना हजारो रूपयांचे देयक देण्यात आले आहे. यावरून सदर विभागाचा गलथान कारभार दिसून येतो. कार्यालयात याबाबत तक्रार केली असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
पाणी येत नाही; पण बिल भरमसाठ
By admin | Updated: January 31, 2015 23:26 IST