वर्धा : संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन चालविणाऱ्या मिनी मंत्रालयाची जुनी इमारत अपूरी पडत होती़ यामुळे नवीन इमारतीचे अनेक टप्प्यांमध्ये काम पूर्ण करण्यात आले़ सदर इमारत मार्च २०१३ मध्ये जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली; या इमारतीला अल्पावधीतच अनेक ठिकाणी तडे गेल्याने एकूण बांधकामावरच प्रश्नचिन्ह लागले आहे़ अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा परिषद रूपी मिनी मंत्रालयाला नवीन सुसज्ज इमारत मिळाली़ या एकाच इमारतीत जि़प़ अंतर्गत चालणारी सर्व कार्यालये आल्याने नागरिकांना शहरात माराव्या लागणाऱ्या चकरा वाचल्या़ शिवाय एकाच इमारतीच सर्वच विभागांचे अधिकारी उपलब्ध झाल्याने शासकीय कामांत तत्परता आली़ या इमारतीचे बांधकाम अनेकदा निधी व अन्य तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते़ २०१३ मध्ये अखेर ती हस्तांतरित झाली; पण यात अनेक दोष असल्याचे आढळते़ तिसऱ्या माळ्यावर एका कार्यालयात हवा येण्यासाठी जागाच नाही़ यामुळे सध्या त्या कार्यालयाद्वारे व्हेंटीलेटरसाठी भिंतीला छीद्र करण्यात आले आहे़ इमारतीच्या डाव्या भागातील गॅलरीच्या भिंतीचे पोपडे पडू लागले आहेत़ शिवाय तळमजल्यावर अनेक ठिकाणी तडे गेल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ इमारतीच्या छतावरील तसेच अंतर्गत पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी विशेष व्यवस्था केल्याचे दिसत नाही़ यामुळे पाईप असताना भिंतीवरून पाण्याचे लोट वाहतात़ शिवाय पावसाळ्यात तिसऱ्या माळ्यावरील बहुतांश कार्यालयांमध्ये गळती लागते़ यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाजात व्यत्यय येतो़ इमारतीमध्ये करण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमध्येही अनेक दोष आढळून येतात़ यामुळेच पाईप असलेल्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले़ शौचालय, स्वच्छतागृह तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही सदोष आहे़ तेथील पाणी साचून राहत असल्याचे दिसून आले़इमारतीला केले प्लास्टर तकलादू असल्याचे आढळून आले़ अनेक ठिकाणी पोपडे पडत असल्याने एकूण बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने इमारतीच्या या अवस्थेबाबत संबंधित कंत्राटदाराला जाब विचारणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
दोन वर्षांतच ‘मिनी मंत्रालयास’ तडे
By admin | Updated: January 3, 2015 23:07 IST