टेकडीचे पालटलेले रूप भरले शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:43 PM2019-07-26T23:43:30+5:302019-07-26T23:45:45+5:30

शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या टेकडीवर हिरवळ फुलविली.

The 'transformed' look of the hill is 'in the eye' | टेकडीचे पालटलेले रूप भरले शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’

टेकडीचे पालटलेले रूप भरले शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’

Next
ठळक मुद्देआॅक्सिजन पार्कमध्ये फिरण्यास मज्जाव : व्हीजेएमचे पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या टेकडीवर हिरवळ फुलविली. त्याला प्रशासनाचीही मदत मिळाल्याने येथे अनेक उपक्रम राबवून आॅक्सिजन पार्क तयार करण्यात आला. मात्र, टेकडीचे पालटलेले हे रूप शिक्षा मंडळाच्या ‘नजरेत’ आले आहे. त्यांनी आता येथे मालकी हक्क गाजवायचा खटाटोप चालविला असून आॅक्सिजन पार्कमध्ये फिरण्यास मज्जाव केल्याचा आरोप वैद्यकीय जनजागृती मंचाने निवेदनातून केला आहे.
निसर्गाची विस्कटलेली घडी सावरण्याकरिता कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर २०१६ पासून तहसीलदारांच्या परवानगीने श्रमदानातून जलपुर्नभरण, वृक्षारोपण व संगोपनाचे कार्य सुरू आहे. या टेकडीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याला २५० सीसीटीद्वारे टेकडीवर जिरविले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत ११ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याकरिता अनेकांनी कष्ट उपसून दोन वर्षे प्लॅस्टिकच्या डबक्यांनी पाणी दिले. या टेकडीवर हिरवळ फुलविण्याकरिता चाललेली धावपळ तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून हजारो लिटर वाया जाणारे अशुद्ध पाणी टेकडीवर वळवून जिरविण्याकरिता जलवाहिनी अंथरूण दिली. टेकडीवरील पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने लोकसहभागातून विद्युत पंप, ड्रिप व काटेरी कुंपणाची व्यवस्था करून हजारो वृक्षांचे संगोपन केले जात आहे.
हल्ली या टेकडीवरील वृक्ष ४ ते ५ फुटांचे झाले असून अनेकांच्या घामाच्या थेंबांनी येथे हिरवळ पसरली आहे. त्यामुळे वर्ध्यातील नागरिक कुटुंबासह सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. कधीकाळी निर्मनुष्य असलेल्या टेकडीवर आता वर्धेकरांची गर्दी होऊ लागल्याने चोरट्यापासून व सरपटणाºया प्राण्यांपासून त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या फंडातून येथे तीन हायमास्ट लावण्यात आले. कालांतराने या परिसराचे ‘आॅक्सिजन पार्क’ असे नामकरण करण्यात आले. परंतु, आज शिक्षा मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या टेकडीवर आपला मालकी हक्क असल्याचे सांगून टेकडीवर कुंपण घातले आहे. सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करून तो या टेकडीवर जाण्यास मज्जाव करतात. त्यामुळे येथील वृक्षांच्या संगोपनाकरिता अडचणी निर्माण झाल्याने यावर तत्काळ उपाययोजना करावी; अन्यथा टेकडी वाचविण्याकरिता पर्यावरण व वृक्षप्रेमी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते अभिनव जनआंदोलन करतील, असा इशारा वैद्यकीय जनजागृती मंचने जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदनातून दिला. निवेदन देताना वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, डॉ. आनंद गाढवकर, प्रशांत वाडीभस्मे, अनंत बोबडे, अजय वरटकर, मंगेश दिवटे, महेश अडसुळे, अरविंद सरदार यांच्यासह पदाधिकारी व निसर्गप्रेमी उपस्थित होते.

वनमंत्र्यांनी येथूनच केली घोषणा
तत्कालीन पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या आॅक्सिजन पार्कला भेट देत वृक्षारोपण केले होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून राज्यभरात नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत टेकड्यांवर असा उपक्र म राबविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह वर्ध्यातील अबालवृद्धांसह युवकांनी श्रमदान केले आहे. अशा स्थितीत या जागेवर आता मालकी हक्क दाखवून टेकडी हडपण्याचा केविलवाणा प्रकार कितपत योग्य? असा प्रश्न वर्धेकर उपस्थित करीत आहेत.

हवे तर ‘बजाज आॅक्सिजन पार्क’ नाव द्या
तीन वर्षांच्या अथक परिश्रमाअंती श्रमदानातून ओसाड पडलेल्या हनुमान टेकडीवर वृक्ष डोलताना दिसत आहे. पण, शिक्षा मंडळाचे काही पदाधिकारी आता आडकाठी आणत आहेत. आम्हाला ही जागा नको, त्याला आमचे नावही नको, हवे तर या आॅक्सिजन पार्कला ‘बजाज आॅक्सिजन पार्क’ किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाव द्या, परंतु ही झाडे मोठी होईपर्यंत तीन ते चार वर्षे त्यांचे संगोपन करू द्या, अशी विनंती वारंवार करूनही शिक्षा मंडळाचे पदाधिकारी हेकेखोरपणा सोडत नसल्याचा आरोपही वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

Web Title: The 'transformed' look of the hill is 'in the eye'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.