एम.एम. शेख यांचा बैठकीतून आरोप पुलगाव : निवडणुकीच्या प्रचारात देशातील नागरिकांना विविध प्रकारची आश्वासने देत देशात अच्छे पाहायला मिळतील, अशी ग्वाही भाजपाने दिली; पण सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करण्याऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटरलशाही डोळ्यापुढे ठेवून देशाचा कारभार चालवित आहे. मग, देशात अच्छे दिन कसे येणार? असा प्रश्न काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एम.एम. शेख यांनी उपस्थित केला.वर्धा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, भाजपा सत्तेत आल्यावर त्यांना अल्पसंख्याक समाजाचा विसर पडला; पण काँग्रेस सत्तेत असो वा नसो, पक्ष सतत अल्पसंख्याक समाजासोबतच आहे. देशात अनेक प्रश्न, अनेक समस्या आहेत, त्याकडे भाजपाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ त्यांना काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही. देशवासियांपुढे १५० वर्षांचा काँग्रेसचा इतिहास आहे. तो कधीच विसरला जाणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करीत ११ एप्रिल रोजी नागपूरला काँग्रेस अध्यक्ष सोनिया येणार असून त्या कार्यक्रम उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी विभागाचे प्रदेश महासचिव नहीम शेख, काँगे्रसचे शहराध्यक्ष रमेश सावरकर, नगराध्यक्ष मनीष साहू, महिला काँगे्रस शहर अध्यक्ष रंजना पवार, हमीदभाई, डॉ. खान आदी उपस्थित होते. बैठकीचे संचालन आणि प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी केले. बैठकीला शकील खान, अब्दुल जलील, मृणाल सोनी, बबलू शुक्ला, मुन्ना, सिद्दीकी, सहारे, लोखंडे, युसूफभाई यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
हिटरलशाहीमुळे ‘अच्छे दिन’ नाही
By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST