पराग मगर -वर्धाबारावीचा निकाल लागून काहीच दिवस झाले आहे. तसेच लवकरच दहवीचा निकालही लागणार आहे. स्पर्धेच्या युगात पालकांकडून पाल्याच्या अपेक्षा वाढत आहे. त्या पूर्ण करू न शकल्याने निराशेचे मळभ साचून मुले आत्महत्येचा पर्याय निवडतात.
अपेक्षेच्या नैराश्येतून बाहेर निघण्यासाठी मुलांनी स्वत: भावनिक बुद्धिमता विकसित करण्याची गरज मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. सुसंवाद महत्त्वाचा:पालकांच्या मुलांकडून अपेक्षा उंचावण्याचे प्रमाण भयंकर आहे. त्यामुळे पालकांच्या या भूमिकेबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. के. पी. निंबाळकर आणि समुपदेशक रत्ना चौधरी यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, हल्ली कुटुंबातून भावनिक संवादच हरवत चालला आहे. नव्याने येत असलेले चित्रपट आणि मालिकांचाही यावर प्रभाव दिसतो. यामध्ये नकळत आपल्या मुलाची इतरांच्या मुलाशी तुलना केली जाते. यातून वाद उत्पन्न होतात. त्यामुळे आता पालक आणि पाल्य यात सुसंवादाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. न्यूनगंड तयार होतो:आईवडीलही मुलांना त्यांच्या बरोबरीच्या मुलांचे उदाहरण देऊन बघ त्याला कसे चांगले गुण मिळाले, वगैरे तुलना करतात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषत: मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या मनावर विपरित परिणाम होऊन न्यूनगंड तयार होतो. त्यातच अशी मुले जर हळव्या मनाची असतील तर आत्महत्येकडे वळतात. जीवघेणी स्पर्धा :अनेकदा आपल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत आईवडिलांकडे नसल्याने ते अडचणीत आलेले पाहूनही मुलांना नैराश्य येते. त्यांना बँकेकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. त्यामुळे आई-वडिलांवर शिक्षणाचा भार येत नाही, हे समजावून सांगितले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊनच चांगले करिअर होऊ शकते असे नाही तर इतरही अनेक क्षेत्रात भरपूर पैसे कमावण्याची संधी आहे, हे बिंबविणेही गरजेचे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा कमी होऊन मुलांच्या मनावरील ताण कमी होईल. मानसिक आजारही जडतात :अनेकदा मुलांना मानसिक आजारही जडतात. मात्र आईवडील ते मान्य करायला तयार होत नाहीत. भारतात या आजारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. सर्वसाधारण परिस्थितीत मुले आत्महत्येकडे वळत नाहीत. आजाराकडे दुर्लक्ष झाले तर खूपच नैराश्य येऊन ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. त्यामुळे या आजारांबाबतही सामाजिक उद्बोधनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी मनमोकळा संवाद साधला पाहिजे. जरी मुले चुकली, तरीही त्यांना ती आपली मुले असल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम असल्याची जाणीव पालकांनी त्यांना करून दिली पाहिजे. तसेच मुलांच्या वागणुकीत जर बदल जाणवला तर मुलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे.