रानडुकरांनी केली कपाशीची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:22+5:30
देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील पडेगाव पांदण रस्त्यावरील वामनराव तेलरांधे यांच्या शेतात रानडुक्करांच्या कळपाने हैदोस घालून दोन एकरातील कपासीचे पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकरी तेलरांधे यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनरक्षक स्विटी दांडवे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.
देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केली. हा प्रकार नेहमीचाच झाल्याने शेतकºयांमध्ये वन्यप्राण्यांबाबत रोष वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी याच शिवारातील विठ्ठल नारायण लाडेकर व सरस्वता वामन तेलरांधे यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे रानडुक्करांनी नुकसान केले.
या शिवाराला लागून पॉवर ग्रीडची सरंक्षण भिंत असून या भिंतीचे बाजूला लोकांच्या रहदारीसाठी म्हणून रस्ता निर्मितीसाठी जागा सोडण्यात आली. परंतु, या जागेवर रस्त्याचे बांधकाम न केल्याने हा परिसर झुडुपांनी व्यापला आहे. त्याच झुडुपांचा आडोसा सध्या वन्यप्राणी लपण्यासाठी घेत आहेत.
विशेष म्हणजे या शिवाराचे आजूबाजूला लोखंडी टॉवरचे जंगल उभे राहिल्याने वानरांचाही नाहक त्रास या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. हे सर्व वन्यप्राणी शेतात येवून शेतमालाचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन सदर वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकºयांची आहे.