वर्धा : गोजी लघुपाटबंधारे प्रकल्प २००३-०४ ला प्रस्तावित झाला. यात १ हजार ३२५ एकर म्हणजे तब्बल ५३० हेक्टर जमीन बुडित क्षेत्र असल्याची कागदोपत्री नोंद केली; पण अद्याप या प्रकल्पाचे कुठलेही काम झाले नाही़ यामुळे सदर प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी परत कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदनही सादर करण्यात आले़मंजुरीच्या वेळी प्रकल्पाची किंमत ९९४.४० लाख रुपये अपेक्षित होती; पण अद्याप प्रकल्पाचे कुठलेही काम झाले नाही. २००३ ते २०१५ अशी सलग १२ वर्षे होऊनही ठोस काम दिसून येत नाही. या १२ वर्षांत ज्या जमिनी कोरडवाहू होत्या, त्या विंचित झाल्यात़ अनेक विहिरी, नाले, बंधारे बांधून शेतकऱ्यांनी आपापल्या सिंचनाच्या सोय केली़ शासनाच्या जवाहर, बजाज फाऊंडेशन, विशेष घटक, जीवनधारा योजनेंतर्गत दर पाच एकरामागे सिंचन व्यवस्था झाली आहे़ आता प्रकल्पाची प्रत्यक्ष गरज राहिली नाही. प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील ८३० हेक्टरमध्ये बहुतांश क्षेत्र सिंचित झाले असून बुडित क्षेत्रातील ५३० हेक्टरपैकी ८० टक्के जमीन सुपिक व सिंचित आहे़ या जमिनी प्रकल्प झाल्यास बुडित क्षेत्रात जातील़ शेतकऱ्यांचे व देशाचे आर्थिक, सामाजिक नुकसान होईल. यामुळे हा प्रकल्प शासन व शेतकरी दोघांच्याही फायद्याचा नाही.सदर प्रकल्पातील संपूर्ण जमीन अद्याप शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे. नवीन भूसंपादन कायदा कलम २४ प्रमाणे शेतकऱ्यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनी ५ वर्षांपर्यंत कोणतेही काम न झाल्यास शेतकऱ्यांना परत करावी, असे नमूद केले आहे. गोजी लघुपाटबंधारे प्रकल्प कागदोपत्री दर्शविण्यात आला आहे़ यास तब्बल ६ वर्षे पूर्ण होत आहे़ यामुळे सदर जमिनी परत करून शेतकऱ्यांना त्यांच्या नावाने सातबारा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली़ निवेदन सादर करताना संजय काकडे, गजानन हायगुणे, आनंदा वरघणे, गजानन वरघणे, वसंता नारनवरे, रूपराव चौधरी, राजू नारनवरे, बाबा मेसरे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
गोजी प्रकल्पासाठी संपादित जमिनी परत करा
By admin | Updated: March 20, 2015 01:48 IST