वर्धा : नोकरदार, आप्तस्वकीय दिवाळी साजरी करण्यासाठी गावी पोहचले आहेत. मात्र दिवाळीचा उत्सव आटोपताच परतीचा प्रवासाला जाताना रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण ‘नो रुम’ दाखवीत असल्याने दिवाळीसाठी आलेल्यांना परत कसे जावे, याची चिंता लागली आहे. त्यामुळे तत्काळचे आरक्षण मिळविण्यासाठी आतापासून अनेकांनी ‘फिल्डिंग’ लावली असल्याची माहिती आहे. यात दलालांचे चांगलेच फावत असले तरी या प्रकाराला आळा घालण्याकरिता रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.याकरिता तिकीट तपासणी पथक कार्यरत करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक जण नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. मात्र दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी न चुकता राहत्या घरी येतात. यावर्षीसुद्धा अनेक जण बाहेरगावाहून घरी पोहचले आहेत. दिवाळी साजरी केल्यानंतर परत जाताना रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यांवर ‘नो-रुम’ चे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, बंगळूर, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, बडोदा, कोलकाता, रायपूर, भिलाई, भोपाल, नाशीक आदी शहरात परतीच्या प्रवासाला कशाने जावे हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबासह घर गाठले आहे. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथे नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक जण घरी पोहचले आहेत. मात्र ५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने दिवाळी साजरी करण्याऐवजी परतीच्या प्रवासाचे तिकीट आरक्षण मिळविण्याची लगबग सुरू झाली आहे. मुंबई, पुण्याचे आरक्षण नो-रूम दाखवत असल्याने किमान तात्काळचे रेल्वे आरक्षण कसे मिळेल, याचे नियोजन उत्सवासाठी आलेले प्रत्येक जण करीत असल्याचे आहे. मुंबई, पुणे जाण्यासाठी बऱ्याच रेल्वे गाड्या आहेत. मात्र एकाही रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नाही, हे वास्तव आहे. वातानुकूलित, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणीचे आरक्षण मिळत नसल्याचे रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दिसून येते.अमरावती-मुंबई एक्सप्रेस, हावडा-कुर्ला एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल, नागपूर-पुणे स्पेशल ट्रेन, हावडा पुणे, हटिया-पुणे, हावडा-पुणे, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, अमरावती-पुणे, नागपूर-पुणे गरीबरथ, नागपूर-पुणे, बिलासपूर-पुणे, नागपूर-मुंबई स्पेशल ट्रेन, विशाखापट्टनम्-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हटिया-एलटीटी, हटिया-सीएसटी सुपर फास्ट, हावडा-मुंबई मेल, हावडा-सीएसटी स्पेशल ट्रेन,हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेस तसेच चैन्नई, कोलकात्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण उपलब्ध नसल्याची माहिती तिकीट बुकिंग करणाऱ्यांकडून मिळत आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेसचे ६०० वेटींग आरक्षण तिकीट निघाले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याकडे रेल्वेने जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल, हे चित्र रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण ‘नो-रुम’
By admin | Updated: October 25, 2014 01:43 IST