हिंगणघाट : नगरपालिकेच्या जुना दवाखाना परिसरात व्यापारी संकुल बांधकामाचा निर्णय पालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. या बांधकामाला शहरातील नागरिकांकडून विरोध होत असून त्या जागी ज्ञान केंद्र आणि सामाजिक व धार्मिक केंद्र किंवा शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता एखादे उद्यान निर्माण करावे, यासाठी स्थानिकांनी आमदारांना साकडे घातले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत ज्ञान केंद्र उभारण्याचा संकल्प समता सैनिक दलाचा असल्याचे म्हटले आहे. या केंद्रामध्ये एक सामाजिक व धार्मिक केंद्र सुद्धा निर्माण करून त्यामध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा दलाचा प्रस्ताव आहे. सोबतच या जागेत संस्कार केंद्र उभारून तरुणांचे लक्ष विधायक कामाकडे वळविण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.वस्तुत: यापूर्वीच नगरपालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात व्यवसायिक संकुल उभारलेली आहेत. यात चिमटेबाबा ग्राऊंड येथील व्यापारी संकुलातील दुकाने, गोलबाजार येथील संकुलाचा समावेश आहे. शहरात इतक्या प्रमाणात नगरपालिकेने व्यापारी संकुल उभारलेले आहेत. याशिवाय शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुस व प्रमुख मार्गावर असलेली खाजगी दुकाने तसेच श्रीराम टॉकीज सारखे खासगी गाळे तयार होत आहेत. शहरातील एकाही नागरिकाने अशा संकुलाची नगरपालिकेकडे मागणी केलेली नसताना नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोई-सुविधाकडे दुर्लक्ष करून सदर व्यापार संकुल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिंगणघाट शहरातील नागरिकांची व्यापारी संकुल असावे अशी कुठलीही मागणी नाही. वस्तुत: शहराला नव्या व्यापारी संकुलाची आवश्यकता नाही. यापूर्वी नगरपालिकेने वेगवेगळ्या परिसरात व्यापारी संकुल बांधलेली आहेत. येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा संदर्भ लक्षात घेता येथे ज्ञान केंद्र आणि सामाजिक व धार्मिक केंद्र उभारण्यात यावे. सोबतच त्या ज्ञान केंद्रसमोर डॉ. आंबेडकर पार्क निर्माण करण्यात यावे. संबंधित बाबींचा विचार करून सदर प्रकल्पाच्या बांधकामास स्थगिती द्यावी आणि सदर भुखंडाचे आरक्षण करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास करावी अशी मागणी नागरिकांकडून आ. समीर कुणावार यांना केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
व्यापारी संकुलाऐवजी ज्ञानकेंद्र उभारा
By admin | Updated: January 8, 2015 23:00 IST