पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:05+5:30

शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.

Raindrops; Crisis of double sowing | पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात खरिपाची १७ टक्केच पेरणी : निकृष्ट बियाणे उठले जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाला होता. परंतु, शेतकऱ्यांमागील संकटांचे दुष्टचक्र थांबता-थाबेना. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना शासनाने कुठलीही आर्थिक मदत केली नाही.
बँकेने पीक कर्जासाठी टाळले म्हणून शेतकऱ्यांनी हातउसने कर्ज घेऊन काळ्या आईची ओटी भरली.
जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७६ हजार ६५४.७५ हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपासीसह इतर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यात सरसरी १७.३१ टक्के खरीपाच्या पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात तूर १०० हेक्टर, सोयाबीन १६० तर कापूस १३ हजार ६००, आर्वी तालुक्यात सोयाबीनची ८२७, तूर २१०, कापूस १५२० आष्टी तालुक्यात तूर ६३९, सोयाबीन १७४२, कापूस ३४६४, कारंजा तालुक्यात तूर ४६८.१, सोयाबीन ११५९.५, कापूस १८७८.१५, सेलू तालुक्यात तूर ३२१९, सोयाबीन ११ हजार ७५३, कापूस १९ हजार ६०२, देवळी तालुक्यात तूर ७३०, सोयाबीन १९०० तर कापसाची ११९७ हेक्टरवर, हिंगणघाट तालुक्यात तूर पिकाची ९७४, सोयाबीन ७११, कापूस ८०५४ तसेच समुद्रपूर तालुक्यात तूरीची २४९, सोयाबीनची ४५५ तर कापूस पिकाची १७९० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काही भागातील पेरण्या अद्यापपर्यंत थांबलेल्या आहेत. यंदा विविध नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली आहे. पेरणी होऊन बराच कालावधी लोटलेला आहे. मात्र, आठवडाभरात साधे कोंबही फुटले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सरकारी दरबारी दाखल झाल्या नसल्या तरी गावोगावी सोयाबीन उगवले अथवा नाही, कृषी केंसद्र चालकांकडून बनावट बियाणे दिले जात आहे काय? याची चर्चा शेतकरी करीत आहेत.

लॉकडाऊनकाळात बोगस बियाणे आले कोठून?
कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच शेतकऱ्यांपर्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे पोहचले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. सरकार बांधावर खते व बियाणे पोहोचवू शकले नाही. मात्र, बोगस बियाणेही रोखू शकले नाही. त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीलाच नागवला गेला आहे. याला जबाबदार कोण? लॉकडाऊनमध्ये बोगस बियाणे आले कुठून? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची चौकशी करून संबधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

पंचनामे होणार, पण नुकसानभरपाई मिळणार काय?
सध्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करुन पेरणी केली. परंतु, आठ दिवसांनंतरही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांना खरच नुकसान भरपाई मिळणार काय, हा प्रश्न आहे. कारण मागील दोन वषार्पासून ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्र देवून, पंचनामे होवूनही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आताही अशीच अवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Raindrops; Crisis of double sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.