अमोल सोटे - आष्टी (श़)जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर माणसाने प्रगतीचे शिखर गाठले. याचाच प्रत्यय बोटोणा येथील शेतकरी राजू जोरे यांनी दिला़ उंच भागावरील ‘रेड झोन’ परिसरातील १६ एकर खडकाळ व मुरूमाट शेती सुपिक करून ठिबक सिंचनाद्वारे विविध पिकांतून सरासरी ओलांडून दुप्पट उत्पन्न त्यांनी घेतले. यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचेही शेताला भेट दिल्यावर सहज लक्षात येते़ या शेतीतून त्यांनी शेतकऱ्यांना आदर्शच घालून दिला आहे़ आष्टी व कारंजा (घा़) तालुक्याच्या सिमेवर असलेल्या बोटोणा गावात दरवर्षी पाण्याचा दुष्काळ असतो़ पावसाच्या पाण्यावर खरीप पीक घेऊन शेतकरी मोकळे होतात. या विपरित परिस्थितीत राजू जोरे यांनी शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्याकडे १६ एकर खडकाळ व मुरमाट शेतजमीन आहे. या शेतात रासायनिक खत देऊन उत्पन्न क्षमता वाढविली. पिकांचे सिंचन व्हावे म्हणून विहीर खूप खोलवर खोदली. विहिरीबाहेर पाणी शुद्ध करण्याचे फिल्टर बसविले. त्याच्या काठावर व्हेंचिरी व मेनीफोल्ट बसविले. सर्व पिकांचे नियोजन करून ५ एकर मिरची, ३०० संत्रा व ७० मोसंबी झाडे या दोन्हीच्या मधोमध टमाटरचे आंतरपिक घेतले़ ८ एकरात कपाशीची लागवड केली. सर्व पिकांना ठराविक अंतर सोडून तार व स्प्रिंगच्या साह्याने संरक्षित केले. प्रत्येक दहा फुटावर खांब जमिनीत गाडले. शेताचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून सौर ऊर्जेवरील तारेचे कुंपण केले़ शेतात दररोज सकाळपासून स्वत: राबणे, मजुरांकडून काम करून घेणे व निंदण वेळेवर करणे सुरू केले. याचा फायदा उत्पन्नात झाला. गतवर्षी एकरी २४ क्विंटल कापूस झाला़ यंदा मिरचीवर रोग आल्याने उत्पन्नात घट आली; पण जोरे यांची मिरची चांगली बहरली़ ५ एकरात २०० क्विंटलचे उत्पादन हाती आले असून अवघ्या ३ तोडाईमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले़ शेतातील दर्जेदार नियोजन पाहून रेड झोनमध्ये अशी शेती होऊ शकते, यावर कुणाचा विश्वास बसत नाही. मेहनत व परिश्रमाच्या आधारावर सर्व शक्य आहे, असाच विश्वास जोरे व्यक्त करतात़ शेतकऱ्यांनी बदलत्या काळासोबत चालल्यास फायदा नक्कीच होतो, हेच या शेतीतून त्यांनी दाखवून दिले़
पाच एकरात २०० क्विंटल मिरचीचे उत्पादन
By admin | Updated: October 28, 2014 23:02 IST