लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण ही गरज आहे पण, आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असल्याने या कोविड-१९ च्या काळात शाळा सुरु करण्याच्या नियोजनासंदर्भात शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण केले असता प्राथमिक शाळेतील सर्वाधिक ४०.८ टक्के पालकांनी नियमित तर माध्यमिकच्या सर्वाधिक ४३. ३ टक्के पालकांनी एक दिवसाआड शाळा सुरु करण्यास पसंती दर्शविली आहे. सकाळ-दुपारच्या सत्रात शाळा सुरु करा म्हणणाऱ्यांचीही संख्या बरीच आहेत.शासनाने नुकताच वर्गनिहाय शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, तत्पूर्वी शिक्षणात खंड पडू नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करता येईल काय? नियमित शाळा सुरु करण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. आपल्याही जिल्ह्यात प्राथमिकच्या १ हजार २१६ तर माध्यमिकच्या ३६० शाळांची माहिती गोळा करण्यात आली. ९८ हजार ७९८ विद्यार्थी प्राथमिकचे तर १ लाख १३ हजार ७६९ विद्यार्थी माध्यमिकचे शिक्षण घेत आहेत. प्राथमिकचे शिक्षण घेणाऱ्या ३१.६२ तर माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या ६५.६३ टक्के पालक किंवा विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पद्धती फारसी उपयुक्त ठरणार नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्राथमिकच्या ७९.३ टक्के शाळा शासकीय असून माध्यमिकच्या ६९.६ टक्के शाळा या खासगी आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अभाव दिसून येतो. म्हणूनच या अडचणी लक्षात घेता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या ४०.८ टक्के पालकांनी नियमित, ३४.८ टक्के पालकांनी एक दिवसाआड तर २६.७ टक्के पालकांनी सकाळ-दुपार सत्राला पसंती दर्शविली आहे. माध्यमिक विभागाचे चित्र यापेक्षा वेगळे असून २६ टक्के पालकांनी नियमित, ४३.३ टक्के पालकांनी एक दिवसाआड तर ३७.२ टक्के पालकांनी सकाळ-दुपारच्या सत्राला प्राधान्य दिले आहे. आता या सर्वेक्षणांती शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग काय निर्णय घेईल, हे येणारी वेळच सांगणार आहे.शिक्षकांकडे स्मार्ट फोन; पण दीक्षा अॅपचा विसरप्राथमिक शाळेमध्ये ४,०५८ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी २,४५९ शिक्षक तंत्रस्नेही आहेत. माध्यमिकमध्ये ३,८९९ शिक्षक असून त्यापैकी १,२४० शिक्षक तंत्रस्नेही आहे. या शिक्षकांकडे स्मार्ट फोन असूनही ते दीक्षा अॅपचा वापर करीत नाही. प्राथमिकच्या ६३.८३ टक्के शिक्षकांकडे स्मार्ट फोन आहेत व ५५.०९ शिक्षकच दीक्षा अॅपचा वापर करीत आहे.ग्रामीण शाळांमध्ये इंटनेट सुविधांचा अभावग्रामीण भागामध्ये प्राथमिकच्या केवळ १४.९ तर माध्यमिकच्या ४५.८ टक्के शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ४९.८ टक्के प्राथमिक आणि ५५.३ टक्के माध्यमिक शाळेत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही आता सेवासुविधा पुरविण्याची गरज कोरोनामुळे निर्माण झाली आहे.शाळा सुरु करण्याबाबत पूर्व तयारीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ही माहिती घेण्यात आली. सर्वच निर्णय जिल्हा पातळीवरुन घेणे शक्य नसल्याने गाव पातळीवरील शाळा व्यवस्थापन समिती तसेच लोकप्रतिनिधींचेही मत नोंदविण्यात आले. आता आरोग्याची काळजी घेण्यासोबतच शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.
प्राथमिक नियमित तर माध्यमिक शाळा एक दिवसाआडला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST
शासनाने नुकताच वर्गनिहाय शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, तत्पूर्वी शिक्षणात खंड पडू नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करता येईल काय? नियमित शाळा सुरु करण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. आपल्याही जिल्ह्यात प्राथमिकच्या १ हजार २१६ तर माध्यमिकच्या ३६० शाळांची माहिती गोळा करण्यात आली.
प्राथमिक नियमित तर माध्यमिक शाळा एक दिवसाआडला पसंती
ठळक मुद्देपालकांनी नोंदविले मत : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण