लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढायला लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य विषयक माहिती जाणून घेण्याकरिता नगरपालिकेच्यावतीने सर्वेक्षण सुरु केले. या सर्वेक्षणादरम्यान शहरातील १ लाख ०३ हजार व्यक्तींकडून माहिती घेण्यात आली. पण, यामध्ये केवळ १६७ जणांनाच सर्दी, खोकला व ताप असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांकडून माहिती लपविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील सुदामपूरी, रामनगर, हनुमान नगर, इतरवारा, गोंडप्लॉट, हवालदारपुरा, गोलबाजार चौक व गांधीनगर आदी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी वाढून रुग्णासोबतच परिसरातील नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेच्यावतीने शहरातील २७ खासगी अनुदानित शाळेतील २६२ शिक्षकांची सेवा अधिग्रहित करुन सर्वेक्षण सुरु केले. शहरातील १९ प्रभागामध्ये असलेल्या २२ हजार ६५० घरांमध्ये १ लाख ३ हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. यासर्व व्यक्तींच्या शिक्षकासह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेटी घेऊन सर्दी, खोकला, ताप, मधुमेह, रक्तदाब आदी आजाराबाबत माहिती जाणून घेतली. या सर्वेक्षणाअंती १ लाख ३ हजार लोकांमधून केवळ १६७ व्यक्तिंनाच सर्दी, खोकला व ताप असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही बाब नागरिकांकरिताच धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.'आजाराची माहिती लपविणे ठरणार धोकादायकनगरपालिका प्रशासनाकडून आयएलआय आणि सारीसाठी सर्वेक्षण केले जात आहे. याव्दारे सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणांची माहिती घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करुन उपचार सुरु करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेकडून शिक्षक व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांव्दारे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून आपल्याला किंवा परिवारातील सदस्यांना असलेल्या आजाराची माहिती देणे गरजेचे आहे. लक्षणे असतानाही त्या संदर्भात माहिती न दिल्याने शहरातील एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच परिवारातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आपल्याला असलेल्या आजाराची माहिती लपविणे या काळात धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.सर्वेक्षण करणाऱ्यांना मिळतेय असभ्य वागणूकशहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षीत ठेवण्यासाठी आपले आरोग्य धोक्यात टाकून शिक्षक व नगरपालिकेचे कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील १९ प्रभागात घरोघरी जाऊन आरोग्यविषयक माहिती जाणून घेत आहे. प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांवर जवळपास १०० घराच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणारे एक-दोन दिवसाआड जाऊन नागरिकांकडून सर्दी, खोकला, ताप व इतर आजारांची माहिती जाणून घेतात. यादरम्यान काही नागरिकांकडून त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात आहे तर काहींकडून असभ्य वागणूक मिळत असल्याचेही शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.शहरात आयएलआय आणि सारीच्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरु केले आहे. जवळपास २६२ शिक्षकांसह नगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण करीत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला व इतर आजारांची नोंद घेत आहे. यातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे. आतापर्यंत वर्धेकरांनी जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य या सर्वेक्षणातही केले तर कोरोनावर निश्चितच यश मिळविता येईल.अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा
लोकसंख्या लाखांवर; सर्दी, खोकला १६७ व्यक्तींनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST
शहरातील सुदामपूरी, रामनगर, हनुमान नगर, इतरवारा, गोंडप्लॉट, हवालदारपुरा, गोलबाजार चौक व गांधीनगर आदी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी वाढून रुग्णासोबतच परिसरातील नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेच्यावतीने शहरातील २७ खासगी अनुदानित शाळेतील २६२ शिक्षकांची सेवा अधिग्रहित करुन सर्वेक्षण सुरु केले.
लोकसंख्या लाखांवर; सर्दी, खोकला १६७ व्यक्तींनाच
ठळक मुद्देशहरातील सर्वेक्षणाचे वास्तव : नागरिक लपविताहेत आरोग्याची माहिती