देशभरातील यात्रेकरू येणार गांधी आश्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:16+5:30
यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : यंदा आचार्य विनोबा भावे यांचे १२५ जयंती वर्ष साजरे होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनी मित्र मिलनचे पवनार येथे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात या निमित्ताने विचार, कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी सर्वोदयींनी यात्रा काढली आहे. यात्रा बुधवारी १३ रोजी सायंकाळी सेवाग्राम आश्रमात पोहचणार आहे.
या यात्रेत वेगवेगळ्या २०० ठिकाणावरून निघालेले ६०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यात्रेकरूंची व्यवस्था यात्री निवास आणि नयी तालिम समिती परिसरात करण्यात आली आहे. यात्रेतील पदयात्री आश्रमात पोहचल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, जिल्हा सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्यावतीने सूतमाळेने स्वागत करण्यात येईल. सर्व यात्रेकरू सायंकाळी प्रार्थनेत सहभागी होतील. यात्री निवास परिसरात यात्रेकरूंचे अनुभव कथन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरूवारी सकाळी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यात्रेला हिरवी झेंडी दाखवून यात्रा पवनार दिशेने रवाना होईल.
सिंधूदुर्ग येथून येणार यात्रा
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गोपूरी आश्रमातून संवाद यात्रा निघाली आहे. हे वर्ष महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण जयंती, आचार्य विनोबा भावे,कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन शतकोत्तर रजत जयंती आणि प्रकाश मोहाडीकर जन्मशताब्दी संयुक्त अभियान अंतर्गत संवाद यात्रा काढलेली आहे. सदर यात्रा १४ रोजी वर्धेत पोहचणार असून १५ रोजी पवनार येथील ब्रम्ह विद्या मंदिरात या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकसंवाद घालण्यात येणार आहे.
देशभरातून यात्रेकरू सेवाग्राम आश्रमात येणार आहे. त्यांचे स्वागत आणि मनोगताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. १५ ते १७ पर्यंत पवनार येथे विनोबाजींच्या जन्मदिनानिमित्य विनोबा मित्र मिलन कार्यक्रम होणार आहे.सर्व यात्रेकरू त्यात सहभागी होतील. सेवाग्राम येथूनच ते पवनार येथे जातील.
- टी.आर.एन.प्रभू,अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सर्वोदयी येत आहे. बा,बापू आणि बाबांना मानणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्ह्यात त्यांचे स्वागत आहे.
- मोहन खैरकार, अध्यक्ष जिल्हा सर्वोदय मंडळ.