प्रवासी त्रस्त : भंगार बसगाड्यांतून प्रवास, पावसाळ्यात गळतात बसेसवर्धा : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात एसटीची आगारे अपयशी ठरत आहेत. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवाशी वाहतूक फोफावली आहे. बसमधील दुरवस्था आणि अस्वच्छता कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी प्रवाश्यांच्या कामाचा खोळंबा होतो.जिल्ह्यात वर्धा, कारंजा, पुलगाव, आर्वी आणि तळेगाव (श्या.) अशी पाच आगार आहेत. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथून सर्वच ठिकाणासाठी बसेस जातात. तसेच तळेगाव(श्या.) हे आगार अमरावती नागपूर महामार्गावर असल्याने येथोन नागपूर आणि अमरावतीसाठी मोठ्या प्रमाणावर बसेस धावतात. सर्वच आगारातील बहुतेक एसटी गाड्या भंगार झाल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. महामंडळाने एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. काही दिवस या योजनेचा गवगवाही करण्यात आला होता. मात्र ही पद्धत कधीचीच औट घटकेची ठरली. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. तरी त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने समस्यांत वाढ होत आहे. एसटीच्यो वाहक व चालकांकडून प्रवाशांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. तरीही याची योग्य ती दखल आगारांकडून घेतली जात नाही. काही दिवसांपूर्वी भर पावसात कारंजा स्थानकावर रात्रीपर्यंत ४० प्रवश्यांना थांबावे लागले होते.नियमित पासधारकांना एसटीच्या अनियमितपणामुळे नियोजित वेळेत व ठिकाणी पोहोचता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी संताप व्यक्त कारतात. यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीच्या बसमध्ये धूळ, माती, कागदाचे चिटोरे, प्लॅस्टिक बॅग असतात. काही वेळा उलटीही असते. एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असल्याचा तक्रारी प्रवाशी करतात. याकडे लक्ष पुरविणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. काही वेळा डेपोवरील शौचालय बंद असतात. अधिकचे पैसे तेथे घेतल्य जात असल्याचेही प्रवासी सांगतात. कधीकधी चिल्लर नसल्याचे सांगून लुबाडणूक केली जाते. यास सर्व बाबींचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होत असून खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे.(शहर प्रतिनिधी)
अस्वच्छ बसेसमुळे प्रवासी त्रस्त
By admin | Updated: August 8, 2015 02:26 IST