जिल्ह्यात सरासरी ७० टक्के : हिंगणघाटात सर्वाधिक ६६.४० टक्के मतदान, दिग्गजांचे भवितव्य यंत्रात बंदवर्धा : वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी या चारही विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी पावसाच्या साक्षीने मतदानाला प्रारंभ झाल्याने फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र दुपारी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदानाचा बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी ७० टक्के आहे. वर्धा मतदार संघात सेलू तालुक्यातील कोंगा बाभुळगाव आणि क्षीरसमुद्रपूर येथे अतिवृष्टी झाल्यामुळे गावात पाणी शिरले. गावांचा संपर्क तुटला होता. यामुळे येथे दुपारी १२ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली होती. दुपारनंतर येथे मतदानासाठी गर्दी उसळली होती. या निवडणुकीत एकूण १० लाख ४० हजार २४४ मतदारांपैकी ६ लाख १ हजार ७९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ लाख २१ २६५ पुरुष, तर २ लाख ८० हजार ४२३ स्त्री मतदारांनी मतदान केले. चारही मतदार संघातील ६९ उमेदवारांसह रणजित कांबळे, अशोक शिंदे, सुरेश देशमुख, दादाराव केचे, सुरेश वाघमारे, राजू तिमांडे, अमर काळे यांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. या मतपरीक्षेत कोण उत्तीर्ण होईल याचा निकाल १९ आॅक्टोबरला लागणार आहे. जिल्ह्यात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. इव्हीएम व व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड आल्याच्या घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. काही भागात सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागकिांनी उशिराने मतदानाला जाणे पसंत केले. याचा सर्वाधिक परिणाम वर्धेत झाला. सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत वर्धा मतदार संघात केवळ २ टक्केच मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक ८.५६ टक्के मतदान आर्वी मतदार संघात नोंदले गेले होते. पाठोपाठ हिंगणघाटमध्ये ७.२२, तर देवळीत ५.५६ टक्के मतदान झाले होते. ९ ते ११ वाजताच्या दुसऱ्या टप्प्यात वर्धा मतदार संघाची टक्केवारी १७ वर पोहचली. आर्वी १२.०६, हिंगणघाट १९.०९, तर देवळीची टक्केवारी १७.९७ इतकी नोंद झाली. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्यात देवळी सर्वाधिक ३९.४२ टक्के, हिंगणघाट ३८.२० टक्के, आर्वी २५.८० टक्के तर वर्धा २३.१५ टक्के मतदान झाले होते. १ वाजतापर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी ३१.६४ इतकी होती. ३ वाजतापर्यंत जिल्ह्यात ४५.४७ टक्के मतदान झाले होते. ३ ते ५ वाजतापर्यंत ५८.२० टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच होती. यावरुन चारही मतदार संघात एकूण सरासरी ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी वर्तविली आहे. सर्व मतदान यंत्र स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येणार आहे. देवळी व वर्धा मतदार संघाची वर्धेतील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात, तर आर्वीत गांधी विद्यालय व हिंगणघाटात तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत मतमोजणी होईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)सिंदी (रेल्वे) येथे युवकाची हुल्लडबाजीदुपारी सिंदी (रेल्वे) येथील एका मतदार केंद्रावर ‘वारे कमळ आया कमळ’ असे नारेबाजी करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार केली नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मतदानासाठी झुंबड, यंत्रणेची तारांबळहिंगणघाट येथील नूतन शाळा मतदान केंद्र क्रमांक २१५ येथे मतदान करण्यासाठी मतदारारात झुंबड उडाली होती. येथील केंद्रावर १ हजार ३९७ नागरिकांचे मतदान होते. मात्र सायंकाळी ५.३० पर्यंत केवळ ७०० नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेने अनेकांना मतदान न करताच परत जावे लागले. तर काहींनी ६ वाजण्यापूर्वी मतदान प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे या केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते.आदर्श मतदान केंद्रआदर्श मतदान केंद्र म्हणून घोषित केलेल्या ३१३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ६.६१ टक्के मतदान झाले होते. ३१६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर २.५४ टक्के मतदान झाले होते. ९.५५ वाजता शिवाजी प्राथमिक शाळा वर्धा येथील २६१ क्रमांकाच्या केंद्रावर ११११ पैकी १२२ जणांनी मतदान केले. एकूणच १०.९८ टक्के मतदान झाले होते. २६५ क्रमांकाच्या केंद्रावर व्हीव्हीपॅटमधील बिघाडामुळे मतदान प्रक्रिया ठप्प होती. सालोड येथील २८३ क्रमांकाच्या केंद्रावर महिला मतदारांची रांग लागली होती. या केंद्रावर १०९० पैकी १७८ जणांनी मतदान केले होते. याची टक्केवारी १६.३ इतकी होती. येथे बेबी बुरबादे या ७५ वर्षीय महिलेने मतदानाचा हक्क बजावला. देवळी मतदार संघातील नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालयातील १६४ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सकाळी १०.४५ वाजता ७४६ पैकी १५९ नागरिकांनी मतदान केले होते. याची टक्केवारी २१.४४ इतकी होती. मतदान केंद्र क्रमांक १६३ वर १९.२० टक्के मतदान झाले होते.
मतपरीक्षा झाली, आता वेध निकालाचे
By admin | Updated: October 15, 2014 23:21 IST