कीटकनाशकाला पर्याय म्हणून वापर : दर्जा वाढण्याचा शेतकऱ्यांचा दावामंगेश व्यवहारे - वर्धादारू शरीराला अपायकारक असली तरी, पिकांसाठी गुणकारी ठरत असल्याचा अजब शोध वर्धेतील शेतकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी महागड्या कीटकनाशकाला पर्याय म्हणून पिकांना देशी दारूचा डोज देत आहेत. यात पिकांची गुणवत्ता वाढत असल्याचेही शेतकरी सांगतात. जिल्ह्यात कोण्या एका शेतकऱ्याने शक्कल लढविली आणि कीटकनाशकाच्या बदल्यात दारूची फवारणी केली. सुदैवाने त्याने लढविलेली शक्कल गुणकारीही ठरली. पिकांचा दर्जा सुधारला आणि महागड्या कीटकनाशकाचा खर्च कमी झाला. हळूहळू हा प्रयोग जिल्हाभर पसरला. आता वर्धा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कीटकनाशकाऐवजी देशी दारूची फवारणी करीत आहेत. शेती करणे शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरतच झाली आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांच्या किमती महागल्या आहे. तुलनेत शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मिळणारा भाव अत्यल्प असल्याने, शेती करताना कशा प्रकारे काटकसर करता येईल, असा त्यांचा प्रयत्न असतो. यातूनच दारूच्या फवारणीचा पर्याय पुढे आला. फळ पिकांवर दारूची फवारणी होत आहे. त्यामुळे पिकांना चकाकी येते, पीक हिरवेगार होते. पिकांवर आक्रमण करणाऱ्या विषाणुजन्य रोगांवर अंकुश बसल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यात अनेक शेतकरी दारूचा वापर करीत असले तरी, कृषी विभाग यापासून अनभिज्ञ आहे. हा पर्याय जर खरच गुणकारी असेल, तर त्याच्यावर कृषी विभागाने संशोधन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आता पिकांनाही दारूचा डोज
By admin | Updated: January 4, 2015 23:16 IST