वायगाव (नि.) : प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. महाराष्ट्र शासनाने ही योजना लागू केली. या योजनेचा लाभ द्रारिद्रय रेषेतील अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकाना मिळणे गरजेचे असतानाही बहुतांश भटक्या जाती जमातीच्या लोकांकडे शिधापत्रिका नसल्याने ते अन्न सुरक्षेपासून वंचित ंआहेत.भटक्या समाजातील बंजारा, गोसावी, गाडी लोहार, गोपाळा, नाथजोगी, बहुरूपी, गवळी, नदीवाले, लोहार, भाविष्य सांगणारे, झाडपत्ती विकणारे, गारूडी अशा अनेक भटक्या समाजातील नागरिकांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या या योजनेपासून नाईलाजाने दूर राहावे लागले. भटक्या समाजातील नागरिकांना मिळणार्या सोई-सुविधा आणि सवलती, आरोग्य सुविधापासून हे समाज वंचित आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्याना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे शक्य नसल्याने त्यांचा नाईलाज आहे. भटक्या समाजातील नागरिकांची स्थिती ही अतिशय वाईट आहे. सतत भटकत असल्याने त्यांना सहन शिधापत्रिका मिळत नाही. तसेच हे नागरिक शिधापत्रिका बनविण्यासाठी गेल्यास त्यांना कागदपत्रांअभावी परत पाठविले जाते. परिस्थिती हलाखीची असल्याने अशा जमातीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिलणे अत्यावश्यक आहे. शासनाने अशा गरीब लोकांसाठीच ही योजना सुरू केली आहे. परंतु त्यांनाच मुलभूत हक्कापासून दूर रहावे लागत असल्याने शासनाच्या या योजनेचा मूळ हेतूच दूर सारला जात आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देवून भटक्या जातीच्या नागरिकांना योजनेचा लाभ व मुलाना शिक्षणासाठी उपाय म्हणून सर्वप्रथम त्यांच्या शिधापत्रिका बनविणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
भटक्या विमुक्त जाती अन्नसुरक्षेपासून वंचित
By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST