सोयाबीनवर मर रोगाचे आलेय नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:38+5:30
कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे. अपुरा पाऊस आणि प्रचंड उष्णतामानामुळे सध्या मर रोगाने डोके वर काढण्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर अंकुरलेल्या रोपट्यांमध्ये बुरशिजन्य रोग, खोडकूज, मुळकूज आदींचेही लक्षणे दिसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : पाऊसात पडलेला खंड व प्रचंड उष्णतेमुळे सोयाबीन पिकावर सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील ज्या भागात अपुरा पाऊस झाला त्या भागातील शेतकरी सध्या अंकुरलेले पीक तुषार सिंचनाद्वारे जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. कृषी विभागाने सोयाबीन उत्पादकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.
अपुरा पाऊस आणि प्रचंड उष्णतामानामुळे सध्या मर रोगाने डोके वर काढण्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर अंकुरलेल्या रोपट्यांमध्ये बुरशिजन्य रोग, खोडकूज, मुळकूज आदींचेही लक्षणे दिसत आहेत.
पावसाने दडा मारल्याने अंकुरलेले पीक सध्या करपत आहे. सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी बुरशीजन्य किटकनाशकाची ड्रिचिंग केल्यास सोयाबीन वाचू शकते असे कृषी विभाग सांगत असले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांनी नेमके काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदाच्या वर्षी सोयाबीन अंकुरलेच नसल्याच्या जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
अशातच पाऊस लांबल्याने सध्या सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
प्रचंड उष्णता व अपूरा पाऊस यामुळे दमटपणा तयार होऊन खोडकून, मुळकून व मर या सारखे बुरशीजन्य रोग सध्या सोयाबीनमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्झीक्लोराईड किंवा तासम बुरशिनाशकाची ड्रिचींग किंवा फवारणी करावी.
- प्रशांत भोयर, कृषी सहाय्यक, पवनार.