२६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:12+5:30

धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

Nature's views on the tur crop on 260 hectares | २६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

२६० हेक्टरवरील तूर पिकावर निसर्गाची वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देथंडी, धुके अन् दवाने वाढविली चिंता । गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मागील आठ दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह धुक्याचे सावट आहे. इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस पारा खाली सरकत आहे. यामुळे तूर पिकाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अशातच तूर पिकावर गोगा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत असून पीकही वाकल्यागत दिसून येत आहे. एकूणच तालुक्यातील २६० हेक्टरवरील तूर पिकांवर सध्या निसर्गाची वक्रदृष्टीच असल्याचे शेतकरी सांगतात.
धुक्याच्या सावटाने आर्वी तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अतीथंडी व धूक्यामुळे उभ्या तुरीवर दव गेल्याने तूर पीक वाकल्यागत अवस्थेत बघावयास मिळत आहे. तूर पिकावरील या व्हायरस गोगामुळे आर्वी तालुक्यातील २६० हेक्टरवरील पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. रोख पीक म्हणून तूर पिकाकडे बघितले जाते. परंतु, डिसेंबर महिन्यात याच पिकावर किडींनी अटॅक केला. तर आता निसर्गाची वक्रदृष्टीच या पिकावर पडली आहे. परतीच्या पावसामुळे पूर्वीच तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला. अशातच खरिपातील सोयाबीनचे उत्पन्नही समाधानकारक राहिले नाही. परतीच्या पावसाचा फटकाच सोयाबीन पिकाला बसला. कपाशी पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादनातही घट येत आहे. शिवाय कपाशीने दगा दिल्याने तूर पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त होती. परंतु, मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तालुक्यातील वाठोडा, वागदा, अहिरवाडा, इठलापूर, नांदपूर, सर्कसपूर, निंबोली (शेंडे), लाडेगाव, टाकरखेडा, जळगाव, वर्धमनेर, देऊरवाडा, टोणा, एकलारा, मांडला, सावलापूर, हरदेली, गुमगाव, दहेगाव, पाचेगाव, पिंपळखुटा, खुबगाव, नांदोरा, रोहणा, वडगाव, चिंचोली, पाचोड यासह तालुक्यातील २६ गावामधील २६० तूर पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’
चिकणी (जामणी) : मागील काही दिवसांपासून परिसरात ढगाळी वातावरण आहे. या ढगाळी वातावरणामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तूर उत्पादकांना पिकावर फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वास्तविक पाहला २०१९ हे वर्ष शेतकऱ्यांच्या अडचणीत वेळोवेळी भर टाकणारेच ठरले आहे. खरिपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. तर त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला. कसे बसे कपाशी पीक बहरले असता त्यावर गुलाबी बोंडअळीने अटॅक केला. तर आता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे, तर थंडीतही वाढ झाली असून पहाटेच्या सुमारास दव पडत असल्याने चणा व गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकूणच यंदाच्या वर्षी शेतमालाला मिळत असलेल्या भावाच्या तुलनेत परिसरातील शेतकºयांना उत्पादन खर्च जादाच लागल्याचे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. शेतातील तणाची विल्हेवाट लावताना परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर केला. अशातच काही शेतकऱ्यांना कपाशी पिकाला मुकावे लागले. तर परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादकांचे कंबर्डे मोडले. सध्या तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु, अळीचा प्रादुर्भाव या पिकावर असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी करावी लागतेय तारेवरची कसरत
चिकणी (जामणी) परिसरात रोही, रान डुक्कर आदी वन्यप्राण्यांचे मोठाले कळप आहेत. त्यांच्याकडून कापूस, तूर, चणा, गहू आदी पिकांची नासाडी केली जात आहे. शेतातील उभ्या पिकाच्या संगोपनासह वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी आहे.

Web Title: Nature's views on the tur crop on 260 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.