प्रफुल्ल महंतारे - समुद्रपूरमुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे़ रस्त्याचे काम आणि शहराच्या कृत्रिम सौंदर्यीकरणासाठी हिरव्या वृक्षांची मात्र सर्रास कत्तल केली जात आहे़ समुद्रपूरला सुशोभित करण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुतर्फा ही कडुनिंबाची झाडे लावण्यात आली होती़ ये-जा करणाऱ्यांना मायेची सावली देणारी ही अजस्त्र हिरवे सौंदर्य नष्ट केले जात आहे़ समुद्रपूर शहरातून जाणाऱ्या हिंगणघाट ते उमरेड मार्गावरील समुद्रपूरच्या विश्रामगृहापासून पोलीस ठाण्यापर्यंतच्या सुमारे दीड किमी रस्त्याच्या रूंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या रस्त्यावर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेले शेकडो कडूनिंबाची झाडे आहेत़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी कडूनिंब व इतर प्रजातीच्या शेकडो वृक्षांची बेदरकारपणे कत्तल सुरू आहे़ पहिल्या टप्प्यामध्ये समुद्रपूर पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत रस्ता करण्यात येणार आहे़ या कामासाठी राज्य शासनाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली़ असून यासाठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत़ रस्त्याची रूंदी साडेबारा मिटर इतकी राहणार असून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दुतर्फा नाली बांधकामाची तरतूद करण्यात आली आहे़या रस्त्याच्या कामासाठी ज्या हिरव्या सौंदर्याचा बळी घेतला जात आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची व संगोपनाची जबाबदारी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही़ या प्रकारामुळे संबंधित कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ वास्तविक निवीदा मंजूर करतेवेळीच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची बाब अंतर्भुत केली जाते़ रस्ता रूंदीकरणामुळे वाहतुकीची समस्या सुटून सौंदर्यात भर पडणार आहे़ यामुळे नागरिक या कामाचे स्वागत करीत असले तरी दीडशे वर्षांपासून छाया देणाऱ्या शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जात असल्याने हळहळ व्यक्त होत आहे़
शहर सौंदर्यीकरणाच्या नावावर शेकडो हिरव्याकंच वृक्षांवर कुऱ्हाड
By admin | Updated: June 11, 2014 23:30 IST