तळेगाव (श्या.पं.) : सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतू हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही असे अनेक अपघाताच्या घटनांवरुन दिसून येते. बसचालक वाहन चालवितांना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र अनेक बसगाड्यांमध्ये दिसून येते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहन चालविताना मोबाईल संभाषणावर बंदी असताना मोबाईलचा वापर केला जात आहे. धावत्या बसमध्येही मोबाईलचा वापर होत असल्याने प्रवाशांंना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बसमधील चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये वाहक व चालक मोबाईलचा सर्रास वापर करतात. यामुळे एसटीला तोटाही होतो. शिवाय अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन मंडळाने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी याबाबत आदेश काढून एसटीच्या चालक व वाहकांनी मोबाईल ठेऊ नये असे सांगितले. मात्र या मोबाईल बंदी आदेशाचा फज्जा जिल्ह्यातील एसटी वाहन चालक करीत आहेत. मोबाईलवर बोलता बोलता तोल ढासळला तर शेकडो प्रवाशांना प्राणास मुकावे लागेल. ही स्थिती एसटीच्या वाहन चालकांना माहिती असतानाही नियमाचा भंग केला जातो. चालक मोबाईलवर बोलून कारवाई करणाऱ्या पथकाची माहिती एकमेकांना देत असतात. त्यामुळे प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देणाऱ्या वाहक व चालक यांना पकडता येत नाही. मोबाईल बंदीचे फर्मान सोडण्यात आले. मात्र याचे पालन वाहन चालक करीत नाही. एमएच. ४०-५३२३ या बसमधील चालक नागपूर वरून अमरावतीकडे येत असताना धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करतो. त्यामुळे या बसमध्ये बसणारे प्रवासी काही वेळासाठी धास्तावले असता धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करून बसमधील शेकडो प्रवाशांच्या जीवाशी तो एसटी चालक खेळत असल्याची तक्रार आहे.आदेशात कारवाईची तरतूद नाही. एसटीचा चालक व वाहकांना मोबाईल बंदीचे आदेश देण्यात आले. परंतु वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर तसेच वाहकाकडे मोबाईल आढळल्यास कारवाई करण्यासंदर्भात परिवहन मंडळाने काहीच निर्णय दिला नाही. त्यामुळे चालक व वाहकांकडे मोबाईल आढळल्यास त्यांच्यावर कसली कारवाई करावी असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडतो.(वार्ताहर)
बसचालकाच्या मोबाईलने प्रवाशांना धोका
By admin | Updated: December 6, 2014 00:25 IST