वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत महसूल विभागाच्या विविध शाखेंतर्गत वाहनाचा ताफा कार्यरत आहे. या वाहनांच्या दुरूस्ती, देखभालीसाठी प्रत्येक वर्षाला एक ठराविक रक्कम देण्यात येते. मिळणारा निधी अत्यल्प असल्याने इतक्या कमी निधीमुळे कधी या वाहनांच्या टायरी फुटणे, कधी ब्रेक निकामी होणे, तर कधी बंद पडणे, अशा संकटांना वाहनचालकांना तोंड द्यावे लागते. यामुळे जिल्ह्यातील अनेक कार्यालयातील वाहने त्यांच्या कार्यालयाच्या आवारात उभी आहेत. विशेष म्हणजे, वाहन रस्त्यात बंद पडले की, गाडीतील साहेब आहे त्या परिस्थितीत दुसरे खासगी वाहन बोलावून निघून जातात. मग तेथून पुढे चालकाची कसरत सुरू होते. अशा एक ना अनेक परिस्थितीत शासकीय वाहनचालकांना दररोज संकटांनाच सामोरे जावे लागते.शासकीय कामांसाठीच ही वाहने फिरवली जातात. दगड, मुरूम, माती, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावरून ही वाहने जावून अधिकारी वर्ग ग्रामीण भागात जाण्याकरिता ही शासकीय वाहनेच वापरतात. यामध्ये वाहनांची देखभाल करण्याचेही काम प्रसंगी खिशातून पैसे घालून वाहनचालकांना करावे लागते. मंत्र्यांच्या ताफ्यात शासकीय अधिकार्यांनाही सहभागी व्हावे लागते. अशावेळी योग्य मेंटेनन्स नसलेली वाहनेही वापरावी लागतात आणि त्यांच्या अत्याधुनिक पद्धतीच्या वाहनांबरोबर ही वाहने पळवावी लागतात. त्यामुळे वाहन चालवताना वाहनांतील जीवांबरोबर स्वत:चाही जीव अक्षरश: टांगणीला लागतो. जिल्ह्यात मंत्र्यांचे कार्यक्रम नेहमीच होत असतात. यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांना त्यांच्या ताफ्यात धावावे लागते. मात्र त्यांचे वाहन जुनाट असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मंत्री निघायच्या काही वेळापूर्वीच त्यांना ठरलेल्या दुसर्या ठिकाणी पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.(प्रतिनिधी)
मेंटेनन्सअभावी अनेक वाहने उभी
By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST