वर्धा : बोंडसुला येथील मधुकर धोटे यांचा १२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय मृतकाचा भाऊ दिलीप धोटे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, जि.प. आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.मधुकर हे सोमवारी बाजारासाठी हमदापूर येथे गेले होते. प्रकृती अस्वस्थ झाल्याने ते डॉ. शंकर लहानुजी कांबळे यांच्या दवाखान्यात गेले. तेथे बोंडसुला येथील अन्य रुग्ण होते. अन्य रुग्णांवर उपचार करीत डॉक्टरने धोटे यांनाही तपासले. यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉ. कांबळे यांनी ‘तुमचे भाऊ सेवाग्राम येथे मरण पावले’, असा निरोप दिला. सेवाग्राम येथील डॉक्टरांनी मात्र सदर रुग्ण मृतावस्थेत आणला, असे सांगितले. डॉ. कांबळे व दिवाकर देशमुख यांनी बाळू राकडे यांच्या आॅटोने मृत मधुकरला सेवाग्राम रुग्णालयात आणले. प्रकृती गंभीर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली नाही. आॅटोचालक बालू रोकडे यांनी आॅटोत बसविले तेव्हा मधुकर यांचा चेहरा झाकून होता, असे सांगितले. या बाबी संशयास्पद असल्याने चौकशी करावी, अशी मागणी दिलीप धोटे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्याच्या मृत्यूची चौकशी करा - मागणी
By admin | Updated: October 16, 2015 02:59 IST