घोराड : बोर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वितरिका व पाटसऱ्यांची साफसफाई केली नसताना रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला आहे़ संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील शेतकरी संताप व्यक्त होत आहे.२४८ कि़मी़ च्या असलेल्या वितरिकांमध्ये मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहे. सायपनची दुरूस्तीही करण्यात आली नाही. वितरिकांची गाळामुळे झालेले खोलीकरण करण्यातही पाटबंधारे विभागाने कर्तव्यदक्षता दाखविली नाही. प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या कित्येक वर्षापासून दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असताना आपल्या शेतात पाणी पाझरून पिकांची हानी होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनाच घ्यावी लागत आहे़पांदण रस्त्याला आडव्या गेलेल्या पाटसऱ्यांवरील सिमेंटच्या पायल्या गत काही वर्षापासून फुटल्या असल्याने बहुतांश ठिकाणी कसरत करावी लागत आहे़ ५० वर्षाच्या झालेल्या बोरप्रकल्पाच्या वितरिका, सायपन, पाटसऱ्याची कायम स्वरूपी दुरूस्ती आदींकडे कुणीही पाठपुरावा केला नसल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता हे कारण पुढे करून रात्र व दिवस पाळीत पाण्याचे नियोजन योग्य रितीने होण्यास कुणीही कर्मचारी वितरिकेवर फिरकत नाही़१२ नोव्हेंबरला रब्बी हंगामाच्या ओलितासाठी बोर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर आता देखरेखीची मदार येणार असल्याचे सांगितले जात आहे़ काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने कामे केली असली तरी ती पूर्णपणे करण्यात आली नसल्याची ओरड आहे़गत काही वर्षांअगोदर प्रत्येक वितरिकेवर शेतकऱ्यांमधून पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या़ एक दोन वर्ष या संस्थानी उत्तमरित्या वितरिकांची साफसफाई करून पाणी नियोजन केले. मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यात यशही आले. या संस्थांना कामासाठी निधी दिला जात होता़ पण काही वर्षापासून या पाणी वापर संस्था नावालाच राहिल्या आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून नदी नाल्याला पाण्याचा ओघ वाढत आहे़शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही तक्रारीची दखल घेण्यासाठी तक्रारदाराला प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्रस्त शेतकरी गुणवंत राऊत यांनी सांगितले़ रबी हंगाम सुरू असून ओलितासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे. तरंतु पाटसऱ्या फुटल्याने शेतकरी वर्गाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
वितरिकांच्या सफाईकडे दुर्लक्ष
By admin | Updated: November 15, 2014 01:59 IST