वर्धा : सांसद आदर्श ग्राम तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्ह्यातील तरोडा गावाचा संचलीत हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात २ आॅक्टोंबर पासून केली. त्या अनुषंगाने वर्धा लोकसभा क्षेत्रातील तरोडा ग्रामपंचायतीची निवड खासदार रामदास तडस यांनी केली. तरोडा गावात विविध विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबवून गाव आदर्श ग्राम तयार करावयाचे आहे. या अनुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषदेच्यावतीने तरोडा गावाचा समुदाय संचालीत हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता पाणी व स्वच्छता विभागाचे २५ सल्लागार, तज्ज्ञ, समन्वयक व्ही. आर. पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पापु व स्वच्छता) यांच्यासह तरोडा येथे उपस्थित झाले. या हागणदारी निर्मूलन कृती आराखड्याबाबत ग्रामपंचायतीला पुर्वीच अवगत करण्यात आल्या नुसार सरपंच सुनीता हरिदास टिकले यांनी बचतगटाच्या महिला व इतर १०० महिलांना ग्रामपंचायत आवारात बोलावून घेतले होते. यानंतर उपसरपंच गणेश तिमांडे, माजी सरपंच विनोद तिमांडे यांनी गावातील नागरिक व युवकांना गोळा करून सुमारे २०० ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातून स्वच्छता फेरी काढून जनजागृती करण्यात आली.स्वच्छता फेरीतून गावातील शौचालय, उघड्यावरील हागणदारी, सांडपाणी व घनकचरा, शेणाचे उकीरडे या बाबत समस्यांची माहिती घेतली. स्वच्छता फेरीची सुरुवात ग्रामपंचायत परिसरातून झाली तर सांगता वॉर्ड क्र. ३ मध्ये करण्यात आली. यावेळी शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्थांकडून माहितीचा अर्ज भरून घेत ते गोळा करण्यात आले.(प्रतिनिधी)
तरोडा गावाची आदर्श ग्रामकडे वाटचाल
By admin | Updated: January 8, 2015 23:00 IST