वायगाव (नि.) : येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते. त्यांच्या कुटुंबियांकडे कुणी लक्ष देत नव्हते. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने ९ आॅक्टोबर उजेडात आणले व त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. बुधवारी तर चिमुकल्यांनी खाऊच्या पैशातून त्या कुटुंबाला मदत करीत आदर्शच घालून दिला.वृत्त उमटल्यानंतर अधिकारी, नेते यांनी भेट देण्यात सुरूवात केली व मदत केली. वर्धा येथील काही नि:स्वार्थी समाजसेवकांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. काही नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या रोजगाराची हमी घेत ग्वाही दिली. लक्ष्मीनगर तिवारी ले-आऊट वर्धा येथील प्राजक्ता सिडाम, प्रणिता सिडाम, प्रसाद कोडगीरवार व अभिषेक होले या चार चिमुकल्यांनीही हे वृत्त वाचल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचे ठरविले. दु:खद परिस्थिती लक्षात घेत या चार चिमुकल्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे तसेच पोलीस क्वॉर्टर, लक्ष्मीनगर, तिवारी ले-आऊट वर्धा आदी भागात फिरून काही रक्कम गोळा केली. या चिमुकल्यांनी स्वत:सह ५० लहान मित्रांचे खाऊचे पैसे गोळा केले. यात एकूण २ हजार ६०० रुपये गोळा झाले. या विद्यार्थ्यांनी प्रथम तहसीलदार राहुल सारंग यांची भेट घेत त्यांना माहिती दिली. यानंतर वायगाव गाठून सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रा.पं. सदस्य आणि पालकांच्या उपस्थितीत ही मदत झोटींग कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीची जाण ठेवून या विद्यार्थ्यांनी स्वत:चे खाऊचे पैसे तसेच परिसरात फिरून काही रक्कम जमा केली. विद्यार्थ्यांचा समाजभान जपणारा हा उपक्रम आदर्शच ठरणारा आहे. तहसीलदार सारंग यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.(वार्ताहर)
खाऊच्या पैशातून चिमुकल्यांची ‘त्या’ शेतकरी कुटुंबाला मदत
By admin | Updated: October 15, 2015 02:27 IST