सुधीर खडसे - समुद्रपूरनेहमी चर्चेत राहणाऱ्या जि़प़ शिक्षण विभागाची डोळेझाक तालुक्यातील हिरडी (व़) शाळेकडे पाहिल्यास पुन्हा समोर येते़ केवळ नऊ विद्यार्थ्यांकरिता तीन कर्मचारी आहे़ त्यांच्या वेतनाचा हिशेब केल्यास एका विद्यार्थ्यासाठी शासनाचा मासिक १० हजार रुपये खर्च होताना दिसतो़ हा खर्च कुणाच्या हितासाठी होतो, हा प्रश्नच आहे़दोन महिन्यांपूर्वी आरटीई निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था तालुक्यातील जिथे शिक्षक संख्या कमी आहे, अशा शाळांत करायची होती़ त्यानुसार काही शिक्षकांचे समायोजन केले़ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा प्रामाणिक उद्देश यामागे सांगण्यात आला; पण काही हितसंबंधातील शिक्षकांना अत्यंत कमी पटसंख्या असताना खासगी सोयीच्या हिताच्या सुलभ शाळेत ठेवण्यात आले़ तालुक्यातील हिरडी प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या नऊ असून अध्यानासाठी तीन शिक्षक कर्मचारी आहे़ शिक्षक वेतनाचा ताळमेळ जुळविला असता तीन कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन ९० हजार होते़ नऊ विद्यार्थ्यांमागे मासिक हिशेब ग्राह्य धरला तर एका विद्यार्थ्यामागे १० हजार रुपये प्रती महिना शासनाचा खर्च होतो़ एकंदर विचार करता वेतनरूपात शासनाचा खर्च होत असलेला खर्च विद्यार्थी हितासाठी की केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ तीन महिन्यांपासून हिरडी (व़) शाळेत ही व्यवस्था पाहावयास मिळते़ कर्तव्यात कसूर केल्याच्या सबबीखाली जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्ह्यातील तीन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली़ मग, शासन नियम, शिक्षणहित व्यवस्थापनाच्या रास्त नियमांना तिलांजली देणाऱ्या तालुक्यातील जबाबदार अधिकाऱ्यांवर जि़प़ प्रशासन कोणती कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ केवळ नऊ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्यात ९० हजार वा त्यापेक्षा अधिक खर्च होत असल्याने वरिष्ठांनी याकडेही लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़
जि़प़ शाळेत विद्यार्थ्यांमागे मासिक १० हजार खर्च
By admin | Updated: December 6, 2014 22:53 IST