आंजी (मोठी) : यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर नुकसानीचे सावट असतानाच उरल्यासुरल्या शेंगांना पाखरांसह माकडांची लक्ष केले आहे. यामुळे सोयाबीनचे थोडे थोडके पीकही हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले झाले आहेत. जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने त्या कालावधीत ड्रीप व तुषार सिंचनाच्या सहाय्याने ओलित केले. तरीही यंदा सोयाबीनच्या शेंगा भरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. ज्या शेंगा भरल्या आहेत त्याच्यावर रोग, किड आणि पाखरांनी हल्ला चढविला आहे. माकडांचे कळपही या पिकांमध्ये उच्छांद मांडत असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यानंतर निदर्शनास येते तीन वर्षापासून नापिकी, दुष्काळ व अन्य संकटांचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्याने संकट उभे ठाकले आहे आंजी परिसरात सकाळच्या सुमारास शेतांमध्ये पिकांवर पाखरांचे थवे बसलेले आढळतात. ही पाखरं सोयाबीनमधील दाणे फस्त करतात. भरीस भर म्हणून मागील काही दिवसांपासून माकडांनी पिकांमध्ये हैदोस घालणे सुरू केले आहे. काही शेत शिवारांमध्ये शेतकरी पिंप वाजवून पिकांची राखण करीत असले तरी पाखरांना आता हा आवाज नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे पाखरे आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात.शेती क्षेत्रातील जाणकारांनी यंदा सोयाबीन पिकात घट येण्याचा अंदाज वर्तविला असतानाच उरलेले पीक पाखरे आणि माकडे फस्त करीत असल्याने शेतकरी विवंचनेत दिसून येत आहेत. कृषी विभागाने उपाययोजना सुचवाव्या तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.(वार्ताहर)
सोयाबीन पिकाला पाखरांनी केले लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 02:30 IST